Wednesday, 28 August 2013

दुनियादारी

पोटासाठी तुडवायची रोजची एकच वाट
रात्रीच्या दारात पहाटेची आस

स्वप्नं सुद्धा अगदी चौकटीत बसवलेली
आतून सगळी पोकळ , वरुन मात्र भरलेली

एकाच विश्वात वसलेली प्रत्येकाची दुनिया न्यारी
आपापल्या सुख-दुक्खान्चि आपापली दुनियादारी
                                           
                                            -- भालचंद्र


Tuesday, 13 August 2013

१५ ऑगस्ट आणि आम्ही

      परवा ऑफीस मध्ये चहा घेता घेता सहजच १५ ऑगस्ट चा विषय निघाला. आमचा अव्या म्हणाला      " अरे आपण या १५ ऑगस्ट ला जनजागृती केली पाहिजे , घरोघरी जाऊन स्त्रीभ्रूण हत्ये पासून  लोकांना परावृत्त केलं पाहिजे , या सुट्टीच्या निमित्ताने आपण बोललं पाहिजे, एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. " असा विषय निघताच सगळे एकदम गप्प झाले, कोणीच काहीच बोलेना, त्या बिचार्याला काहीच दाद मिळेना , उलट सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. साहजिकच होतं, १५ ऑगस्ट म्हणजे आपल्याला वारसहक्काने मिळालेली सुट्टी ...त्यात ती गुरुवारी आलेली,  शुक्रवारी  रजा टाकली की लगेच शनिवार- रविवार सुट्टी.  म्हणजे दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत मस्त एन्जॉय करायचा सगळ्यांचा प्लान होता. त्यामुळेच असल्या क्रांतीकारी, समाजहितकारक वगैरे फालतू गोष्टींसाठी कोणाला वेळ नव्हता, सबब अव्या ला रेस्पॉन्स म्हणून सगळे एकदम गप्प झाले. थोड्या वेळात अव्या चहा घेऊन निघून गेला , बाकीचे सगळे ही कामाला लागले , मी मात्र काहीसा अंतर्मुख झालो.

     मला आपल्या सगळ्यांच्या (भारतीयांच्या) मधल्या एका गोष्टीची फार गंमत वाटते. असा काही वेगळ्या मार्गाने जायचा कोणी विचार मांडला की त्याला उघडपणे कोणी विरोध ही करत नाही किंवा कोणी पाठिंबा ही देत नाही. सगळेजण एकदम गप्प बसतात ...अगदी पिनड्रॉप साइलेन्स .  बघा ना .. राज्यात दुष्काळाचे सावट आलेय , आम्ही आमच्या आमच्या बादल्या भरून गप्प. रस्त्यात कोणाचा आक्सिडेंट झालाय, आम्ही थोडासा चुकचुकाट करून गप्प. देशात बलात्कारचे प्रमाण वाढले ...आम्ही आमच्या दाराच्या कड्या लावून गप्प . तिकडे सीमेपालीकडचे नपुन्सक नराधाम  आमच्या मर्द जवानांची मुंडकी पैजा लावून पळवून नेतात , आम्ही डोळे मिटून गप्प. चाइना आमच्या भारत मातेचा पदर उडवून लावून सरळ सरळ अब्रू लुटायला बघतो , आम्ही तिकडे काणा डोळा करून गप्प. भ्रष्टाचाराच्या शर्यतीत आमचे राजकारणी दिवसेंदिवस सुवर्ण पदके पटकावतात, आम्ही त्यांच्या नावाने बोटे मोडून गप्प.
  
      मध्ये एकदा अण्णा हजारे नावाच्या पवित्र दीपस्तम्भाने आमच्या मुठी वळवायला आम्हाला भाग पाडले . धमन्यांमधून खरच रक्त धावतय आणि आपण खरच जिवंत आहोत असं वाटायला लागलं , प्रत्येकजण त्या  देवमाणसाच्या हाकेला  देत घरातून बाहेर पडला. इतक्यात सरकारने आपली विषारी खेळी खेळली, आन्णांवरतीच काहीतरी "जन्तर मंतर " केले, अचानक संघर्ष थांबला. भेद नीतीने सरकारने आंणांच्या सैन्याला भगदाड पाडले, बघता बघता आन्ंणांची टीम विस्कटली. स्वत:ला डेंगू चा डास म्हणवणारे केजरिवाल (स्वत:ची अतिशय योग्य पारख या गृहस्थानाच झाली आहे) आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून आपला एक राजकीय पक्ष स्थापन केला , तर तिकडे अण्णानि  आपल्या उरल्यासुरल्या निष्ठावंत (?) माणसांना सोबत घेऊन एक नवी फळी उभारली.

        या दरम्यान घराबाहेर पडलेली आमची पाऊले रस्त्यातच अडखाळली आणि पुन्हा आपापल्या घराकडे वळली. भरीस भर म्हणून  IPL  सुरू झाले आणि आम्ही "झाम्पिंग झापांग झम्पक झम्पक" च्या तालावर  नाचत नाचत (शी.. किती दळभद्रं गाणं होतं ते ) पुन्हा एकदा गप्प झालो .

     आजही काहीसं तसंच  झालं होतं. अव्यासारखी  देशासाठी आपापल्या परीने धडपडणारी माणसं आजही आहेत आणि ती आपल्या अवती भोवती वावारताहेत हे बघून मी मनातून सुखावलो होतो . पण त्याहीपेक्षा एक मोठं दु:ख माझं काळीज पोखरून काढत होतं. भविष्यात आव्यासारख्या लोकांना  जर अशी आमच्यासारखीच गप्प बसणारी, बोटचेपी माणसं भेटत गेली तर एक दिवस आव्यासुद्धा आमच्या सारखाच होईल. कदाचित "२६ जानेवारी ला काहीतरी उपक्रम राबवू ,  देशासाठी काहीतरी करू"  असं कोणीतरी म्हणेल तेव्हा आव्या ही हाताची घडी घालून गप्प बसलेला पाहायला मिळेल. दिवसेंदिवस मौज मस्तीच्या कैफात बुडालेली , नादान, मस्तवाल, आळासावलेली बुजगावणी  तयार करण्याचा कारखाना या हिंदुस्थानात अहोरात्र सुरू आहे या उपर दुसरे दुर्दैव ते काय ?

                                                                                                                                    --भालचंद्र