Monday, 30 June 2014

अस्तित्व

आज सकाळी मला जाग आली तेव्हा
अंथरुणात पडलेल्या अस्तित्वांच्या गाठोड्याकडे लक्ष गेले
त्या गाठोड्यात प्रत्येक अस्तित्वासोबत
रंगी-बेरंगी बुरखे ठेवले होते कुणीतरी …बहुतेक मीच

संभ्रमावस्थेत एक बुरखा मी उचलला इतक्यात
दुसर्याने नाराजीचा सूर आळवला
दुसर्याला हातात घेताच तिसर्याने डोळे वटारले
वैतागून मग सगळे बुरखे तिथेच टाकून तडक उठलो अन ध्यानात आले
पायात बेड्या ठोकल्या होत्या कुणीतरी …बहुतेक मीच

गडबडीने खिसे चाचपुन एक किल्ली काढली
बेड्या सोडवायचे लाख प्रयत्न केले , मग आठवलं
भूतकाळाच्या कुलुपांना भविष्याची किल्ली लागत नाही
थकलो, रडलो , कुलूप तुटतंय का बघून झालं
माझ्या प्रत्येक घावानिशी अधिकाधिक मजबूत होत चाललेल्या त्या बेड्या माझ्यावर हसू लागल्या
मी हताश , निराश तसाच पडून राहिलो काही काळ

जाग आली तेव्हा माझ्याच कर्तृत्वाची दुर्गंधी पसरली होती घरभर
आता मात्र निकराने आळस झटकून उठलो
निश्चयी मुद्रेने सगळ्या बुरख्यांची घडी घालून व्यवस्थित ठेवले
उशीखाली हात फिरवला , एक किल्ली मिळाली
सगळ्या बेड्या एका झटक्यात सुटताना कळलं कि
वर्तमानाची किल्ली सगळ्या कुलुपांना लागते

सारं सामान एका पोत्यात भरून पाठीवर टाकलं
उशाशी पडलेला हसरा मुखवटा उचलला आणि दणकट पावले टाकत मी चालू लागलो

अस्तित्वाची लढाई मी रोज अशीच
कर्तव्याच्या ढाली ने नि नाईलाजाच्या तलवारीने
आजवर जिंकत आलोय

---भालचंद्र 

Wednesday, 4 June 2014

कविता

चंद्र , सूर्य , तारे,
फुले, पक्षी, झाडे
डोंगर दऱ्या नि समुद्र सारे 
सगळे जिथल्या तिथे ठेवूया 
आणि मग एक कविता लिहूया 

कशाला हव्यात सुख दुक्खांच्या कुबड्या 
अन कशाला हवीय ती ?
आठवणी वगैरे दाटून बिटून येउदेत कि यायच्यात तेव्हां 
कुंथून कुंथून किती शब्द हागणारेस ?
स्वर, व्यंजन, वृत्त, मात्रा , अलंकार
एवढेच काय तर शब्द च सारे बाजूला ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

वाहवा नि टाळयांचा मोह आवर थोडासा
स्वत्व सोडून गेलेल्या स्वत:ला सावर थोडासा
यमक छन्द जुळवशिलच की शेकडो बरी बुरी
एक तरी ओळ लिही लेका खरी खुरी
आयुष्याच्या शाईने जगणे लिहू थोड़े थोड़े
बाकी कागद सारे कोरेच ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

जखमा आणि वेदनांचे सूर आळवलेस किती
दिसू नए कोणाला म्हणून
ओघळलेले आश्रू वाळवलेस किती
देण्या घेण्याचा हिशोब होइल च की ढगात
आपण खाली फ़क्त जगणे शिकून घेउया

सूर्य चन्द्र तारे
फुले पक्षी झाडे
डोंगर दरया नि समुद्र सारे
सगळे जिथल्या तिथे ठेवुया
आणि मग एक कविता लिहूया

--भालचंद्र