आता कसं की, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी
आपण दोघे सुखरूप राहू
आता आपली सुख-दुःखं वेगळी
आपल्या वाटा वेगळ्या
आपले किनारे वेगळे
आपल्या लाटा वेगळ्या
आता तुझे सर्वस्व तू
आणि माझे सर्वस्व मी
आयुष्यभर अशीच समांतर भटकंती करून आपली भेट होईल ती आता स्मशानातच...
परंतु
तिथे सुद्धा तुझी चिता वेगळी
माझी चिता वेगळी
तुझ्या-माझ्यासाठी रडणारे काही डोळे मात्र कदाचित सामाईक असतील...त्यांच्या दुर्दैवाने ...
तुझी-माझी राख गंगेमध्ये टाकलीच जर कुणी, तर तिथे मात्र आपण एकरूप होऊ,
तोपर्यंत आपण सुखरूप राहू,
तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी...
-भालचंद्र