Wednesday, 28 August 2013

दुनियादारी

पोटासाठी तुडवायची रोजची एकच वाट
रात्रीच्या दारात पहाटेची आस

स्वप्नं सुद्धा अगदी चौकटीत बसवलेली
आतून सगळी पोकळ , वरुन मात्र भरलेली

एकाच विश्वात वसलेली प्रत्येकाची दुनिया न्यारी
आपापल्या सुख-दुक्खान्चि आपापली दुनियादारी
                                           
                                            -- भालचंद्र


Tuesday, 13 August 2013

१५ ऑगस्ट आणि आम्ही

      परवा ऑफीस मध्ये चहा घेता घेता सहजच १५ ऑगस्ट चा विषय निघाला. आमचा अव्या म्हणाला      " अरे आपण या १५ ऑगस्ट ला जनजागृती केली पाहिजे , घरोघरी जाऊन स्त्रीभ्रूण हत्ये पासून  लोकांना परावृत्त केलं पाहिजे , या सुट्टीच्या निमित्ताने आपण बोललं पाहिजे, एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. " असा विषय निघताच सगळे एकदम गप्प झाले, कोणीच काहीच बोलेना, त्या बिचार्याला काहीच दाद मिळेना , उलट सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. साहजिकच होतं, १५ ऑगस्ट म्हणजे आपल्याला वारसहक्काने मिळालेली सुट्टी ...त्यात ती गुरुवारी आलेली,  शुक्रवारी  रजा टाकली की लगेच शनिवार- रविवार सुट्टी.  म्हणजे दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत मस्त एन्जॉय करायचा सगळ्यांचा प्लान होता. त्यामुळेच असल्या क्रांतीकारी, समाजहितकारक वगैरे फालतू गोष्टींसाठी कोणाला वेळ नव्हता, सबब अव्या ला रेस्पॉन्स म्हणून सगळे एकदम गप्प झाले. थोड्या वेळात अव्या चहा घेऊन निघून गेला , बाकीचे सगळे ही कामाला लागले , मी मात्र काहीसा अंतर्मुख झालो.

     मला आपल्या सगळ्यांच्या (भारतीयांच्या) मधल्या एका गोष्टीची फार गंमत वाटते. असा काही वेगळ्या मार्गाने जायचा कोणी विचार मांडला की त्याला उघडपणे कोणी विरोध ही करत नाही किंवा कोणी पाठिंबा ही देत नाही. सगळेजण एकदम गप्प बसतात ...अगदी पिनड्रॉप साइलेन्स .  बघा ना .. राज्यात दुष्काळाचे सावट आलेय , आम्ही आमच्या आमच्या बादल्या भरून गप्प. रस्त्यात कोणाचा आक्सिडेंट झालाय, आम्ही थोडासा चुकचुकाट करून गप्प. देशात बलात्कारचे प्रमाण वाढले ...आम्ही आमच्या दाराच्या कड्या लावून गप्प . तिकडे सीमेपालीकडचे नपुन्सक नराधाम  आमच्या मर्द जवानांची मुंडकी पैजा लावून पळवून नेतात , आम्ही डोळे मिटून गप्प. चाइना आमच्या भारत मातेचा पदर उडवून लावून सरळ सरळ अब्रू लुटायला बघतो , आम्ही तिकडे काणा डोळा करून गप्प. भ्रष्टाचाराच्या शर्यतीत आमचे राजकारणी दिवसेंदिवस सुवर्ण पदके पटकावतात, आम्ही त्यांच्या नावाने बोटे मोडून गप्प.
  
      मध्ये एकदा अण्णा हजारे नावाच्या पवित्र दीपस्तम्भाने आमच्या मुठी वळवायला आम्हाला भाग पाडले . धमन्यांमधून खरच रक्त धावतय आणि आपण खरच जिवंत आहोत असं वाटायला लागलं , प्रत्येकजण त्या  देवमाणसाच्या हाकेला  देत घरातून बाहेर पडला. इतक्यात सरकारने आपली विषारी खेळी खेळली, आन्णांवरतीच काहीतरी "जन्तर मंतर " केले, अचानक संघर्ष थांबला. भेद नीतीने सरकारने आंणांच्या सैन्याला भगदाड पाडले, बघता बघता आन्ंणांची टीम विस्कटली. स्वत:ला डेंगू चा डास म्हणवणारे केजरिवाल (स्वत:ची अतिशय योग्य पारख या गृहस्थानाच झाली आहे) आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून आपला एक राजकीय पक्ष स्थापन केला , तर तिकडे अण्णानि  आपल्या उरल्यासुरल्या निष्ठावंत (?) माणसांना सोबत घेऊन एक नवी फळी उभारली.

        या दरम्यान घराबाहेर पडलेली आमची पाऊले रस्त्यातच अडखाळली आणि पुन्हा आपापल्या घराकडे वळली. भरीस भर म्हणून  IPL  सुरू झाले आणि आम्ही "झाम्पिंग झापांग झम्पक झम्पक" च्या तालावर  नाचत नाचत (शी.. किती दळभद्रं गाणं होतं ते ) पुन्हा एकदा गप्प झालो .

     आजही काहीसं तसंच  झालं होतं. अव्यासारखी  देशासाठी आपापल्या परीने धडपडणारी माणसं आजही आहेत आणि ती आपल्या अवती भोवती वावारताहेत हे बघून मी मनातून सुखावलो होतो . पण त्याहीपेक्षा एक मोठं दु:ख माझं काळीज पोखरून काढत होतं. भविष्यात आव्यासारख्या लोकांना  जर अशी आमच्यासारखीच गप्प बसणारी, बोटचेपी माणसं भेटत गेली तर एक दिवस आव्यासुद्धा आमच्या सारखाच होईल. कदाचित "२६ जानेवारी ला काहीतरी उपक्रम राबवू ,  देशासाठी काहीतरी करू"  असं कोणीतरी म्हणेल तेव्हा आव्या ही हाताची घडी घालून गप्प बसलेला पाहायला मिळेल. दिवसेंदिवस मौज मस्तीच्या कैफात बुडालेली , नादान, मस्तवाल, आळासावलेली बुजगावणी  तयार करण्याचा कारखाना या हिंदुस्थानात अहोरात्र सुरू आहे या उपर दुसरे दुर्दैव ते काय ?

                                                                                                                                    --भालचंद्र


Monday, 3 June 2013

आला पाऊस गेला पाऊस


आला पाऊस गेला पाऊस
माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस

आज अंत हा पाहून गेला
उगा चौकशी करून गेला
दोन क्षणांची चुकली गणिते
पाठ पुन्हा ही फिरवून गेला
मला पावसा घाल अन्हिके

तुझे पोर हे असे लाडके
तुझीच माया तुझीच दुनिया
तुझेच सारे तुझेच खेळ
अंबरातुनी तुझ्याच त्याही
माझ्यासाठी हसला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस  ....

एकांती तव पैंजणा चे
भास होता क्षणोक्षणी
नकळत कानी गुंजन करिती
पुन्हा नव्याने जुनीच गाणी
नको सखी हा विरह आताशा
अंतरातुनी ओसांडून बघ
नसांनसांतून भिनला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस
उनाड अल्लड लेकरापरी
ढगात पुन्हा दडला पाऊस

माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस ...

                      --  भालचंद्र

Wednesday, 17 April 2013

वेध मनाचे: एक पत्र पावसाला

वेध मनाचे: एक पत्र पावसाला: प्रिय पावसा ,       बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे...

Tuesday, 16 April 2013

एक पत्र पावसाला


प्रिय पावसा ,
      बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे म्हणत होती " सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल काय ? " तेव्हाच तुझी आठवण आली. म्हटलं आज तुला पत्रच लिहून  विचारावं , कधी येण्याचा विचार आहे साहेबांचा ?

         महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तुला माहिती आहेच , पण मला त्याबद्दल नाही बोलायचं तुझ्याशी आज. महाराष्ट्रातल्या दुष्काळपेक्षा सुद्धा  खूप मोठा दुष्काळ पडलाय माझ्या मनात. खूप दिवस झाले रे हसता हसता रडून आणि रडता रडता हसून. पूर्वी हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून आनंद- दुक्खा चे झरे वाहायचे गोड-खारट पाण्याचे... आता ते ही अगदी आटले  आहेत.  बाकी माझं अगदी उत्तम चालू आहे असं लोकं म्हणतात. माझ्याप्रमाणेच  ते ही  मनाने दुष्काळग्रस्त असावेत. माझ्या कोरड्या हसण्याला फसतात  ते सगळे. तसे हल्ली सगळेजण दुष्काळग्रस्तच भेटतात मला. कोणी हंगामी तर कोणी बारमाही. रोज उठून तेच दुष्काळी चेहरे बघायचा कंटाळा आलाय बघ . मध्यंतरी सरकारने खोटा खोटा पाऊस पाडायचा प्रयत्न केला तेव्हा थोडा आसावलो होतो मी. म्हटलं पाऊस पाडायला नाही जमलं तर निदान ढग तरी दाटून आणा थोडेसे. तेवढाच थोडासा रडून मोकळा झालो असतो मी. पण तो ही प्रयोग फसला नेहमीप्रमाणे. म्हणून मग आता म्हटलं डाइरेक्टच विचारावं तुला.
         खूप जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र एकटाच आहेस रे तू माझा . मागच्या पावसाळयापासून साचलेलं सगळं सांगायचं आहे तुला. खूप गोष्टी तुझ्याशी शेअर  करायच्या आहेत ज्या मी फक्त आणि फक्त तुलाच सांगू शकतो. तुला घट्ट मिठी मारुन कडकडून भेटायचंय मला. तू आलास की किती मस्त हुन्दडतो ना आपण सगळीकडे. तू म्हणशील तिथे म्हणशील तितका वेळ भटकत असतो मी तुझ्यासोबत. मागच्या वर्षी " राहिलेली मजा पुढच्या वर्षी " असं सांगून गेलास तीच राहिलेली मजा आता मला करायची आहे.
       आणि आलास ना या वेळी की नुसतं थेयिमान घाल. कोणाचंही काहीही एइकू नकोस. तुला माहितीये मी फक्त बाहेरून भिजत नाही. आतून , अगदी आतून प्रत्येक कप्पा न कप्पा चिंब झाल्याशिवाय मला तू आल्यासारखं वाटत नाही. तू भिजवलेल्या मातीचा गंध नसानसांतून भिनवल्याशिवाय मला जिवंत असल्यासारखाच वाटत नाही. 
   असो... आणि हो ,एकटाच येऊ नकोस. येताना "तिची" आठवण पण घेऊन ये आठवणीने. या वर्षी थोडी कमी आण , पण आणच. काय आहे ना, शरीराचं कितीही वय वाढलं तरी मनाचं वय नाही रे वाढवता येत. थोडी हूरहुर पण घेऊन ये झालंच तर. तिच्या ओल्या हातांच्या स्पर्शाचा भास मात्र नको आणूस ...का ते तुला आल्यावर सांगेन मी .सगळ्याच गोष्टी अशा पत्रात लिहीणे बरोबर नाही.
      या वर्षी आलास की मी तुला लवकर मात्र जाऊ देणार नाही . पुढच्या वर्षी तू परत येईपर्यंत पुरेल एवढा ओलावा माझ्या हृदयाला आणि मनाला दे आणि मग जा खुशाल हवं तर . आणखी एक म्हणजे हे पत्र तुला मिळेल तेव्हा नेहमीसारख ओलं ओलं नाही लागणार हाताला . अरे दाटून खूप आलंय रे पत्र लिहिताना पण मी रडणार मात्र नाही या वेळी . तसं ठरवलच आहे मी. म्हटलं  तू आल्याशिवाय आता रडायचच नाही अजिबात. तू आल्यावरच काय असेल ते होऊन जाऊ दे तुझ्यासमोर . म्हणून रोखून  ठेवले आहेत अश्रू तुझ्यासाठी.
       बर आता जास्त काही एमोशनल लिहीत नाही. लवकर ये आता इकडे. आणि यायच्या आधी कळव नक्की मला . मागच्या वर्षी सारखा असा अचानक दारात येऊन उभा राहू नकोस . काही सुचत नाही रे तू असा एकदम आलास की . अगदी कावराबावरा  होउन जातो मी . मी तुला न्यायला येइन यंदा माझ्या नवीन बाइक वरुन .तिथेच आपल्या नेहमीच्या टेकडीवर . आई ला पण सांगून ठेवलंय मी तुझ्या आवडीची कांदा भजी करायला. आता जास्त वाट पाहायला लावू नकोस आणि ये बरं पटकन .

तुझा आणि फक्त तुझाच बारमाही पावसाळी मित्र. :)
भालचंद्र

मागेच उडाले होते


घरट्यासाठी परक्यांच्या आयुष्य वेचले ज्याने
घरट्यातील तयाच्या पक्षी उदास होते

कवड्या उदरतेच्या माझ्यावर उधळल्या त्याने
माझ्याकडेच ज्याचे सारे उधार होते

बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते

हा कोणत्या युगाचा दाविलास मज चेहरा
सारीच श्वापदे अन् माणूस कोण नव्हते

चित्र हे उद्याचे जरी आज काढतो मी
रंग तयातील आवडते मागेच उडाले होते

                                  -- भालचंद्र भुतकर


Saturday, 16 February 2013

डायरी

माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
आक्ख्या जगात एक तीच तर होती
जी माझं सगळं शांतपणे एइकून घ्यायची
मी कसाही वागलो किती ही वैतागलो
तरी रोज रात्री अलगद माझ्या हाताखाली यायची

सगळ्यांपासून लपवून
एक मोरपीस मी तिला दिलं होतं सांभाळायला
खूप समजूतदार होती ती
कधी अत्यानंदाचे क्षण मला मिठीत घेऊन तिने स्वतःत उतरवले होते
तर कधी मला शब्द देऊन तिने दुक्खाना सावरले होते
माझे सगळे हिशोब वगैरे पण तीच बघायची
थोडी ताटातूट चालायचीच
पण ती ही निमूटपणे सगळं पाहायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

बोलली नाही ती कधी मला
पण लपून छपून ती ही माझ्यावर प्रेम करायची
स्वतःच्या आयुष्यातील काही पाने तिने मुद्दाम कोरी ठेवली होती
माझ्यासाठी...
मी ही मग त्यावर कधी हिशोब मांडायचो नाही
अशी सगळी गंमत चालायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

कधी कधी मला खूप भरून यायचं
अगदी आतून आतून तुटायचं
खूप एकट एकट वाटायचं
तेव्हा ही असायचीच सोबत
अगदी पहाडासारखी खंबीर माझ्या बाजूला
माझ्या डोळ्यातल्या सरीना तिनेच तर आंगण दिले होते
मुक्तपणे बरसायला
अश्रूनी पुसल्या गेलेल्या माझ्याच शब्दांचे अर्थ
मलाच कानात येऊन सांगायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

एकदा रात्री मी नशेत असताना
मला ती सोडून गेली
माझे मोर पीस मात्र आठवणीने देऊन गेली
सालाबाद प्रमाणे मी ही तिला विसरून गेलो
नव्या संकल्पांच्या जोशात तिला कुठेतरी सोडून आलो

परवा घर आवरताना अचानक
पोटमाळ्यावर मला ती दिसली
माझ्याप्रमाणे ती ही आता म्हातारी झाली होती
पण तरी ही अगदी अगदी ओळखीचं हसली
मी तिला हातात घेतलं
माझ्या पाणावलेल्या डोळ्या ईतकेच
तिचे काठ पण थोडेसे ओलावले होते
एवढी वर्षं निघून गेली पण तरीही
तिची सवय गेली नव्हती
माझ्या मनातलं किती अचूक ती ओळखायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
                                     
                                                --  भालचंद्र भुतकर