रोज सकाळी अंथरुणातून उठताना जाणीव होते छाताडावर नाचणाऱ्या माझ्याच अगणित अस्तित्वांची . जणू काही मी डोळे उघडायचीच वाट बघत रात्रभर माझ्या अवतीभवती ते सगळे वावरत असतात आणि मी डोळे उघडताक्षणीच माझ्या उरावर असंख्य प्रश्नचिन्ह घेऊन नाचायला लागतात. हे आता सवयीचं होऊन बसलंय. रक्तपिपासू जळवान्प्रमाणे माझ्या मनाला चिकटून बसलेल्या या अस्तित्वांच्या प्रश्नांना तोंड देता देता माझ्या तोंडाला फेस येतो.
प्रश्न असा पडतो की , मी नेमका आहे तरी कोण ?
आतून कुठूनतरी एक ठरलेले उत्तर येते ... इंजीनियर, लेखक, मित्र, भाऊ, मुलगा, प्रियकर, खेळाडू, हिंदू, माणूस, देव, राक्षस इत्यादी इत्यादी हजारो बरोबर उत्तरांपैकी एक उत्तर आपली बाजू मांडत काही काळ रेंगाळत राहत मनभर. दिवसभराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी वेगळा वेगळा असल्याचा शोध लागतो माझा मलाच. सकाळी उठल्यानंतर मी सुजाण समाजातील एका सुशिक्षित कुटुंबाचा एक भाग असतो. त्यातही मुलगा, भाऊ, मामा, काका इत्यादी शेकडो उपप्रकार आहेत. उदरनिर्वाहाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर मी एक मध्यमवर्गीय , प्रामाणिक असा नोकरदार असतो. त्यातही कोणासाठी जुनिअर , कोणासाठी सिनिअर , कोणासाठी अतिमहत्वाचा तर कोणासाठी अतिसामान्य अशा क्याटेगरीज आहेत. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत चहा घेत गप्पा मारताना मी एक प्रेमळ, विश्वासू मित्र असतो
असा दिवस निघून गेला की वाटत एक अख्खं आयुष्य निघून गेलं. रात्री, अंगावरचे कपडे खुंटीवर टांगताना कपड्यांसोबत मी मलाच टांगत असल्याचा भास होतो. त्याच खुंटीवर काही वर्षांनी एक म्हातारी काठी टांगत असल्यासारख वाटत, तर आणखी काही वर्षांनी मी स्वत:च फोटो बनून लटकत असलेला सुद्धा दिसतो. त्या फोटोतल्या "मला" सुद्धा कितीतरी अस्तित्वे लगडलेली असतात- कुणाचा आजोबा, कुणाचा बाप, कुणाचा मित्र, तर कुणाचा शत्रू, कुणासाठी निष्फळ , निरुपयोगी, उपद्रवी, किरकिरा म्हातारा, तर कुणासाठी प्रेमळ, आनंदी, निस्वार्थी , दयाळू देवमाणूस.
आता मी नेमका कोण आहे याचा शोध घेत घेत मन खोल जाऊ लागत, जितक खोल जाइल तितकंच सारं फोल वाटू लागत. संभ्रमावस्थेत मग मी देवघरात जतो. तिथेही तीच परिस्थिती - स्थितप्रद्न्य ,शांत , निश्चल अशा अनेक प्रतिमा तिथे धूळ खात पडलेल्या दिसतात , प्रार्थनेला त्यांच्यापैकी कोणाला निवडावे हा एक निराळा प्रश्न.
तिथून उठून मी घराबाहेर पडतो , तर देवळात जावे कि मशिदीत, चर्च मध्ये कि गुरुद्वारामध्ये असे विविध प्रश्न उभे असतात माझ्या दारात. देऊळ हा ऑप्शन निवडला , तर पुन्हा कोणत्या देवळात ? हा मागोमाग येणारा प्रश्न.
छ्या …. साला सगळच खोट आहे , सगळच व्यर्थ आहे , मर्त्य आहे मर्यादित आहे . अमर्याद आहेत त्या फक्त माझ्या शंका आणि माझ्या पाचवीला पुजलेल्या अस्तित्वांच्या रांगा . मग अस्वस्थता, चिडचिड , स्वत: शी भांडण असे रोजचे ठरलेले कार्यक्रम झाले की कधीतरी मी हताश , निराश होऊन डोळे मिटून पडतो आणि अचानक शोध लागतो मला स्वत्वाचा . मला उत्तर मिळून जात ... "मी" कोणीच नाहीये , मुळात "मी" हि संकल्पना च खोटी आहे.
आहे तो फक्त प्रवास , तिमिरातून तेजाकडे, अनंतातून अनंताकडे, क्षितीजाकडून क्षितिजाकडे . मेल्यानंतरही न सुटणारी अशी चिकट अस्तित्वे आयुष्यभर कमावल्यानंतर त्यातलं एक तरी अस्तित्व कोण्या एकाच्या तरी आयुष्यभर लक्षात राहील असे जगावे असे मला वाटते.
कारण... खुंटी तशीच राहील तिथे , बाकी खुंटीवरचे कपडे, काठ्या , फोटो आणि दृश्य- अदृश्य स्वरूपातील नादान , निर्लज्ज अस्तित्वे बदलतच राहतील पिढ्यान पिढ्या ,युगानु युगे …
गर्दीत माणसांच्या हरवून जन्म गेला
नुसत्याच येरझाऱ्या, घालून जन्म गेला
--भालचंद्र जयप्रकाश भुतकर