Tuesday, 24 December 2013

प्रवास

      आभाळातल्या चंद्राला मी कधी पौर्णिमे साठी झुरताना पाहिलं नाही , अर्ध्या चंद्र कोरीत सुद्धा तो परिपूर्ण असतो . अमावास्येच्या रात्री आभाळाचा निरोप घेऊन निघून जाताना सुद्धा त्याला कधी दु : ख होत नाही आणि दुसर्या दिवशी परत येण्याची घाई पण कधी असत नाही . पहिल्या दिवशी तो जितका स्थितप्रद्न्य आणि निश्चल असतो तितकाच तो शेवटपर्यंत असतो आणि यापुढेही असेल याची मला  खात्री आहे .

      पूर्णत्वाचा गर्व नाही , अपूर्णतेचे दु: ख नाही , आणि अस्तित्वाची चिंता नाही . आहे तो फक्त प्रवास - अखंड आणि अविरत . या प्रवासाला सुरुवातही नाही अन शेवटही नाही … म्हणूनच तो सुंदर आहे , शांत आहे , परिपूर्ण आहे .
                                                                                                 -- भालचंद्र 

Thursday, 19 December 2013

थोडी गंमत (पु. ल. श्टाइल )


माणसाने प्रत्येक गोष्ट तर्कशुद्ध विचाराने करू नये , कधी कधी विचारांना सोडून नुसतं वाहत जावं, असं करण्यात मजा येते . एक वेगळाच माणूस आपल्यात लपलाय हे कळून येतं . वेडा होऊन पण वेड्यासारखं वागण्याचा कंटाळा येतो म्हणून वेडी लोकं पण कधी कधी शहण्यासारखं वागतात . मग शहाण्या माणसाना वेडे पणा करावासा वाटला नाही तरच नवल.
आमचे एक मित्र आहेत. प्रशासकीय सेवेत ऊच पदावर अधिकारी आहेत. लाल दिव्याची गाडी, सरकारी सुरक्षा , आजूबाजूला नोकर चाकर असा एकंदरीतच रूबाब मोठा दांडगा. पण रोजच्या रोज साहेब म्हणवून घ्यायचा कंटाळा येतो म्हणून सुट्टीच्या दिवशी आपल्या ड्राइवर ला आपला पोशाख देऊन त्याला साहेब करतात आणि स्वत: ड्राइवर बनतात . मोठी गंमत येते म्हणतात . आधी ड्राइवर ला पण थोडं वेगळं वाटलं , पण आता तो ही चांगला तयार झालाय . त्याला ही रोजच्या ड्राइवर पणाचा कंटाळा आला असेल , दुसरं काय ?

एकाच गोष्टीची फक्त भीती वाटते ; साहेबाच्या बायकोने रोजच्या साहेबाला कंटाळून ड्राइवर ला च एक दिवस गंमत म्हणून नवरा मानलं , तर केवढ्याला पडेल ?

---भालचंद्र

Saturday, 23 November 2013

एका फकिराचे मनोगत

परवा माझा शिर्डीला जाण्याचा योग आला. शिर्डी म्हणजे अर्थातच श्री साईबाबांचे गाव , माझ्या बहीनीची साईबाबांवर प्रचंड श्रद्धा . त्यामुळे तिच्यासोबत माझा पण शिर्डीला जाण्याचा योग आला.
पुण्यापासून शिर्डी म्हणजे साधारण २०० कि. मी. च्या आसपास. ओवरनाइट जर्नी करून आम्ही अगदी पहाटे पहाटे शिर्डी ला पोचलो. आदल्या दिवशी दिवसभर ऑफीस मध्ये दमलेलं होतो, त्यात रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. अर्धवट झोपेचा चांगलाच प्रभाव माझ्या चेहऱ्यावर दिसून येत होता. माझे सुजलेले डोळे, विस्कटलेले केस आणि पारोसं ध्यान यावरून माझी "अवस्था" कोणाच्या ही सहज लक्षात येईल अशी  होती. शिर्डी मधल्या गर्दीने  पहाटेच्या सुंदर , प्रसन्न वातावरणाला थ्रेड लावला होता. एक विचित्र , नकोनकोसं वाटणारं उबट   वातावरण मनाला अस्वस्थ करत होतं . त्या गर्दीतून वाट काढून बरोबर आम्हालाच शोधून काढून त्रास देणारे  " साब रूम चैइये क्या साब ? " असं घाणेरड्या टोन मध्ये विचारणारे लॉज वाल्यांचे चे दलाल आणि गुलाबाची फुले विकणारी , तोंडातून लाल पिंक रस्त्यावर बेधडक मारणारी  माणसं माझी चिडचिड वाढवायला पुरेशी होती.  या सगळ्यांना एकेरी झुंज देत मी आणि माझी बहीण साधारण ६ च्या आसपास दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग मोठी होती , दीड दोन तासांचा सहज चुराडा होणार होता, आणि माझ्या संयमाची परीक्षा घेतली जाणार होती. मी थकलेल्या , वैतागलेल्या , त्रासीक मुद्रेने रांगेत उभा राहिलो , आम्ही पाच पाच मिनिटांना जांभया देत , शरीराला रेलिंग चा आधार देत हळू हळू रांगेतून पुढे जात होतो. गर्दी प्रचंड होती, मी ती गर्दी न्यहाळत  , स्वत:च्या संयमाचा तोल सांभाळत असताना बर्‍याच जणांच्या हातात गुलाबाची फुले असलेलं लक्षात आलं. जसं गणपतीला दुर्वा आवडतात, शंकराला बेलाची पाने आवडतात, तसं साईबाबांना गुलाब आवडत असावेत असा एक अंदाज मी एक जांभई देता देता बांधला.

     पहाटेची वेळ असल्यामुळे रात्रीच्या प्रवासातून आलेली बरीच मंडळी त्या गर्दीत होती, त्यापैकी काही जण रात्रीचं जेवण अजीर्ण झाल्याचा पुरावा बेधडक पणे देत होते. रांग पुढे जाईल तशी मागची माणसं रांग तोडून पुढे जाउ पाहायची मग बाकीचे लोक त्यांना शिव्या देऊन परत मागे यायला भाग पाडायचे. मधूनच कोणीतरी   " सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ..." असं जोरात ओरडायचं मग बाकीचे सगळे " जय ..." असं त्याच टेंपो मध्ये ओरडायचे . काही जण " ओम साई नमो नम: , श्री साई नमो नम: , सद्गुरू साई नमो नम: , जय जय साई नमो नम: " असं एका विशिष्ठ चालीत म्हणायची . ही सगळी गंमत पाहत मी त्या रांगेतून आपोआप पुढे सरकत होतो .

चालता चालता म्हाताऱ्या माणसांना, बायकांना ते थकल्यानंतर बसण्यासाठी म्हणून बेन्चेस ठेवले होते , अशाच एका बेंच वर मी थोडा वेळ बसलो आणि क्षणभर डोळे मिटले.  अचानक माझ्या मेंदूमध्ये एक विलक्षण वीज चमकलि , डोकं गरगरायला लागलं, दरदरुन घाम फुटला , छाती चे ठोके वाढले , हार्ट अटॅक येतोय की काय असं वाटून मी डोळे उघडले आणि बघतो तर काय ...माझ्या समोर रेलिंग च्या नळीवर साक्षात साईबाबा बसले होते . मी चक्रावलो , वेडावलो , अस्वस्थ झालो आणि मोठ्याने ओरडणार इतक्यात ते मला म्हणाले " बाळा ...घाबरू नकोस , ओरडु पण नकोस, मी साई च आहे आणि सध्या फक्त तुलाच दिसतो आहे, इतर कोणालाही मी दिसत नाहीये , थोडं पाणी पी आणि शांत हो , तू शांत झालास की मग आपण बोलू. " मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि घटा घटा पाणी घशात ओतलं , रुमालाने घाम पुसला मग थोडा नॉर्मल ला आलो. साईबाबा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते . मी पण उत्तरादाखल थोडासा हसलो, म्हणालो " बाबा, तुम्ही इकडे कसे काय ?"

साईबाबांनी त्यांची पेटंट मळकी, पांढरी कफनि घातली होती, डोक्याला टिपिकल पांढरा बंडाना बांधला होता. क्षणभर माझ्या मनात विचार येऊन गेला... साईबाबांनी निदान आता तरी असं राहायला नको , त्या वेळची त्यांची परिस्थिती हलाखीची होती , ते गरीब होतें पण आता त्यांची प्रत्येक छोट्या मोठ्या गावात मंदिरे आहेत, स्वत:ची भरपूर इस्टेट आहे, अंबानी बंधूंना लाजवेल एवढी संपत्ती आहे, आता तर त्यांनी मस्त, सूट बूट घालून दाढी वगैरे चकाचक करून कसं मस्त निवांत राहायला हवं. असा मध्यमवर्गीय विचार माझ्या मनात सुरू असतानाच बाबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...

"अरे मी इकडेच असतो राजा , तू इकडे कुठे ते सांग ."

"अं ..हां हां हां " मी विचारांच्या तन्द्रितुन बाहेर येऊन उगाचच हसलो आणि म्हणालो ..." अहो म्हणजे तसं नाही , एवढी सगळी लोकं तुमच्या दर्शनासाठी रांगेत उभी आहेत, खूप लांबून ते तुमच्या भेटीसाठी आलेली असताना तुम्ही ऑफीस (गाभारा) सोडून इकडे कुठे फिरताहात "?

साईबाबा मनापासून हसले आणि मला टाळी  देत म्हणाले "चांगलीच फिरकी घेतोयस हां माझी ".

"अहो मी काय तुमची फिरकी घेणार ? मलाच इथे रांगेत उभं राहून चक्कर यायची वेळ आलीय , रात्री झोप पण नाही झाली व्यवस्थित , तुमचं काय बाबा सोन्याच्या सिंहासनावर बसून तुम्ही आपल्या भक्तांची गंमत फक्त पाहत असता", मी थोडासा त्रासीक स्वरात बोललो.

बाबा-" अरे मी त्या गाभाऱ्यात नसतो हल्ली , तिथे खूप गुदमरतं मला , सुरुवाती सुरुवातीला असायचो मी तिथे , भक्तांच्या डोळ्यात श्रद्धा , सबुरी पाहून खुश व्हायचो , माझ्या जन्माचं  सार्थक झाल्यासारखं वाटायचं मला , पण हल्ली खूपच बाजारीकरण झालंय रे सगळं , पाच मिनिटं पण त्या गाभाऱ्यात मन लागत नाही, पहाटे पासून रांग उभी असते दारात , पण एकाच्या ही मनात श्रद्धा, सबुरी पाहायला मिळत नाही, ", बाबा हळहळून सांगत होते.


"अरे या लोकांनी माझ्या समाधी स्थळावर माझा पुतळा बसवला , त्याला सोन्या चांदीने मढवलं , आयुष्यभर भिक्षा मागून, फाटके, मळके कपडे घालून, भौतिक सुखापासून जाणून बुजून दूर राहिलेल्या माणसावर या लोकांनी मेल्यावर मात्र हर एक भौतिक सुखाची उधळण केली, वा रे वा ...काय ही श्रद्धा ..माझ्या वागण्यातून, बोलण्यातून मी नेहमी समता, बंधुता , प्रेम या गोष्टींचा अवलंब केला, गरीबीने , परिस्थितीने गांजलेल्या लोकांची या हातांनी जन्मभर सेवा केली, काय संदेश दिला मी तुम्हाला माझ्या जगण्यातून ? " बाबा खूप पोट तिडिकीने बोलत होते.
" आजच्या या रांगेत एकूण २३ मोठे व्यापारी आले आहेत, मी त्यांना चांगलाच ओळखून आहे कारण त्यांनी मला त्यांचा बिज़्नेस पार्ट्नर बनवला आहे. "

" बिज़्नेस पार्ट्नर ? हा काय प्रकार आहे ? ", मी एकदम चक्रावून जात विचारले.

अरे बाबा मोठे मोठे बिज़्नेसमन माझ्या पुढे येऊन लेखी करार करतात आणि त्यांच्या बिज़्नेस मध्ये भागीदारी देऊ करतात, त्यांचा  असा समज आहे की साई ला पार्ट्नर केला म्हणजे साई कृपेमुळे धंदा बुडणार नाही आणि नुकसान झालेच तर साहजिकच त्याचा फटका मला ही बसेल आणि मी माझा फायदा वाढवण्यासाठी त्यांचा धंदा वाढीस लावेन" .

" बाबा, तुम्ही हे असं पण करता "?  मी

" अरे नाही रे ...मला काय कळतय त्यांच्या बिज़्नेस मधलं ? मी एक साधा फकिर, भिक्षुक, अडाणी...  मी कशाला त्यांच्या धंद्यात ढवळाढवळ करू"?

 "मग तुम्ही त्यांना शिक्षा का करत नाही" ? मी बोललो .

"हा हा हा ...अरे मी त्यांना शासन करणारा कोण ? मी स्वता: या पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्माला आलो, भगवंता च्या  कृपेने मोक्ष प्राप्तीचा  मार्ग मला समजला , म्हणून त्या मार्गाने आयुष्यभर चाललो , चालता चालता वाटेत भेटणाऱ्याना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यागाचं महत्व पटवून दिलं, सबका मालिक एक असा संदेश मी माझ्या सहकाऱ्यांना दिला, आणि शेवटी आनंदाने माझा देह सोडून मी निघून गेलो, तर यांनी  मलाच देव बनवलं , माझ्यासमोर रोज लोटांगणं घालायला लागले, यांच्या आयुष्यात घडणाऱ्या तथाकथित सुख -दुक्खांच्या  प्रसंगांसाठी मला कारणीभूत धरू लागले.

मोठे गंमतीशीर वागतात हे लोक. म्हणजे एखाद्या विवाहित दांपत्याला लग्नाच्या ५ वर्षांनतर मूल झालं याला कारण त्यांनी शिर्डीला येऊन ५००१ रु. अर्पण केले हे . पुढे तो मुलगा मोठा झाला आणि परीक्षेत नापास झाला तर याला कारण काय तर बरेच दिवस शिर्डीला नाही गेला ...एकदा जाऊन ये म्हणजे होशील पास .
 आता हे तुम्हा लोकांच्या तरी सद्सद्विवेक बुद्धी ला पटताय का ?
पहिली गोष्ट - रुपये ५००१ हा माझा मूल जन्माला घालायचा रेट कोणी ठरवला ? आणि समजा उद्या उठून हा ५००१ रुपयांचा मुलगा दीड दमडीचा चोर बनला तर यात दोष कोणाचा ?
दुसरी गोष्ट - तुमचा मुलगा वर्षभर अभ्यास करून सुद्धा एम. बी. ए. ची परीक्षा पास होत नाही तर हा अडाणी साई तिथे काय करू शकणार आहे ?

मी साईबाबांचा सेन्स ऑफ ह्यूमर बघून मनापासून हसलो. आता आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. एकमेकांना टाळ्या देत आम्ही त्या रांगेतून पुढे जात होतो. सगळंच एकदम अनाकलनीय आणि अविश्वसनीय सुरू होतं. बघा ना साक्षात साईबाबा माझ्यासोबत त्यांच्याच मंदिरातल्या दर्शनाच्या  रांगेत उभे राहून गप्पा मारत होते आणि सबंध रांगेत या कानाची त्या कानाला खबर होत नव्हती , साईबाबा आणि माझ्या वयामध्ये किमान दीड शतकाचं अंतर होतं पण मला अगदी ते माझ्या कॉलेज मधल्या मित्राप्रमाणे वाटत  होते. मी पण सगळा थकवा , त्रास विसरून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो.

मी - बाबा , हा सगळा ढोंगीपणा तुम्ही रोज पाहता , तुमचं काळीज अगदी क्षणक्षणाला तुटत असेल ना ?

साईबाबा - आधी खूप त्रास व्हायचा सगळ्या गोष्टींचा पण आता सवईच झालंय सगळंच  , मी आता गंमतीत घेतो सगळं.

मी- पण असं सगळ्याच गोष्टी गंमतीत घेऊन कसं चालेल ?

साईबाबा - अरे आयुष्यात कोणी कसं जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं आयुष्याला समजावून घेत जीवन जगत असतो. आणि त्या मार्गाने त्याला हवे ते मिळवायचा प्रयत्न करत असतो . कोणीही कसेही वागले म्हणून सृष्टीचे नियम बदलत नाहीत , आजही झाडावरून परिपक्व झालेलं फळ आनंदाने आपोआप जमिनीवरच पडतं , आभाळातून रिमझिमणार्‍या सरींनी आंगण भरलं की आजही प्रत्येकाच्या मनात आशेची कळी उमलतेच, सूर्य नारायण रोज आजही नित्यनेमाने उगवतोच.
या जगात कोण काय करतं यावरून कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही , लहान- मोठा , गरीब - श्रीमंत , सुख-दु:ख हा भेदभावच मुळात अतिशय अनैसर्गिक आणि दिशाभूल करणारा आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून तिचं अस्तित्व हे सगळ्यांसाठीच एक गूढ बनून राहिलं आहे. पण या सृष्टीचे काही अलिखित नियम आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे माणसाचा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो, अशा नियमांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासारख्याच काही व्यक्तीनी या पृथ्वीवर केला.
कुंडीमध्ये लावलेलं रोपटं थोडासा सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी मिळालं की कसं तरारून फुलतं , आनंदाने डोलू लागतं , त्याच्या आयुष्याचा हेतूच  मुळात आनंद घेणे हा असतो , पण त्याच्या नकळत ते इतरांना आनंद देत असतं , जगणं शिकवत असतं . त्याच्याकडे पाहून जो शिकला तो शिकला , कोणी नाही शिकलं म्हणून ते रोपटं आनंद घेणं सोडत नाही . म्हणूनच माणसाने आपलं कर्म करून शांत राहायचं असतं , हेच कारण आहे की मला या सगळ्याचा राग येत नाही , कधी कधी वाईट वाटतं एवढंच .
मी तंद्री लागल्यासारखा बाबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून घेत होतो.
"मी कोणी देव  नाही किंवा संतपुरूष ही नाही, ही विशेषणे मला तत्कालीन समाजाने लावली. "

मी भारावून गेलो होतो , मी बाबांना म्हणालो " बाबा, माझ्यासाठी काही आज्ञा असेल तर सांगा, समाजासाठी काही तरी करायची माझी ही ईछा आहे.

बाबा हसून म्हणाले " बाळा , एवढाच कर , मी जे तुला सांगितलं ते तुझ्या जवळच्या नातेवाईकांना , मित्रांना सांग. या फकिराचे मनोगत सगळ्यांना कळूदे . मी श्रीमंतांचा , गुन्हेगारांचा साई नसून मी गरीबाच्या अश्रू मधून ओघळणारा थेंब आहे, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात मी आहे
लहान मुलाच्या उत्साहात मी आहे , जिथे जिथे निखळ ,नि:स्वार्थी, शुद्ध प्रेम आहे तिथे तिथे मी आहे , तुझ्यात मी आहे, माझ्यात मी आहे , आपण सारे एक आहोत , मला भेटण्यासाठी कोणालाही शिर्डीला यायची गरज नाही , या जगाकडे जो प्रेमाच्या नजरेने बघेल त्याला स्वत:च्या नजरेत मी दिसेन. माझा हा संदेश तू सगळ्यांना दे.
मी भरून आलेल्या अंत:करणाने त्या युग पुरुषाकडे बघत होतो.

अचानक माझ्या मागून एक आरोळी ऐकू आली, " बोला सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ....जय !!!" आणि मी भानावर आलो . इतका वेळ चाललेलं सगळं स्वप्न होतं . मी खडबडून पाहिलं तर गाभारा जवळ आला होता , लोकांचा उत्साह द्विगुणित झाला होता, मी साईबाबांच्या गाभाऱ्याच्या एग्ज़ॅक्ट बाहेर उभा होतो  .

पाणावलेले  डोळे, भरून आलेले अंत:करण आणि समोर साईबाबा , असा तो सोहळा होता. माझ्या मागे उभ्या असलेल्या  एक बाई मला धक्का मारुन आत ढकळत होत्या ,
 मी म्हटलं " एक मिनिटं काकू मला रांगेतून बाहेर जायचंय ". असं म्हणून मी रेलिंग च्या खालून वाकून रांगेतून बाहेर आलो.

"अरे पण दर्शन "? मागच्या काकू आश्चर्याने म्हणाल्या

"माझं दर्शन मघाशीच झालाय काकू , आता खूप कामं आहेत मला … असं वेळ वाया घालवून चालणार नाही , गाभाऱ्यातलं  सोन्याचं सिंहासन खूप छान आहे म्हणतात , तुम्ही बघून या आणि सांगा मला कसं आहे ते, बाकी रांग लावून बघण्यासारखं काही उरलं नाहीये तिथे  आता.

शिर्डीला जाताना मी रिकामा गेलो होतो पण पुण्यात परत येताना माझ्याकडं भरपूर काही होतं सांगण्यासारखं , लिहिण्यासारखं  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्यासारखं ...जणू काही जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस झालो होतो .एवढं सगळं मला दिलं होतं ...एका फकिराने,

--भालचंद्र

Thursday, 26 September 2013

नकार

दूरवर पसरलेल्या हिरवळीमध्ये
रिमझिम बरसनार्‍या पावसाचा आनंद कसा घ्यायचा याची कधी ट्युशन लावावी लागते का ?

चंद्राचे शीतल चांदणे पांघरून शांतपणे झोपताना
"आयुष्य सुंदर आहे " हे वेगळं सांगायची गरज असते का ?

एन तरुणाईत गुलाबी थंडीतल्या गुलाबी गप्पा
तासन्तास मारण्यासाठी विषयांची कमतरता कधी भासते का ?

आपलं नातं ही अगदी तसंच आहे
तुझ्या खिडकीतून हसणारा नि माझ्या अंगणातून डोकावणारा
तो चंद्र एकच आहे
आपण एकमेकाना भेटलो नाही म्हणून काय झालं ?
आपल्याला भिजवणारा पाऊस एक आहे
आणि तो मृदगंध ही
मला सुखावणारी प्रत्येक झुळूक सुद्धा आधी तुलाच भेटून येते
याची ही मला खात्री आहे

सूर्याला पृथ्वी वरचं आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी
पृथ्वीवर यायची कधी गरज असते का ?

प्रिये , या सर्व प्रश्नांचे उत्तर "नाही" असेच आहे
म्हणूनच तर तुझ्या "नाही" चे मला कधीच वाईट वाटले नाही .

                                                                      --भालचंद्र

Wednesday, 28 August 2013

दुनियादारी

पोटासाठी तुडवायची रोजची एकच वाट
रात्रीच्या दारात पहाटेची आस

स्वप्नं सुद्धा अगदी चौकटीत बसवलेली
आतून सगळी पोकळ , वरुन मात्र भरलेली

एकाच विश्वात वसलेली प्रत्येकाची दुनिया न्यारी
आपापल्या सुख-दुक्खान्चि आपापली दुनियादारी
                                           
                                            -- भालचंद्र


Tuesday, 13 August 2013

१५ ऑगस्ट आणि आम्ही

      परवा ऑफीस मध्ये चहा घेता घेता सहजच १५ ऑगस्ट चा विषय निघाला. आमचा अव्या म्हणाला      " अरे आपण या १५ ऑगस्ट ला जनजागृती केली पाहिजे , घरोघरी जाऊन स्त्रीभ्रूण हत्ये पासून  लोकांना परावृत्त केलं पाहिजे , या सुट्टीच्या निमित्ताने आपण बोललं पाहिजे, एक जबाबदार नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. " असा विषय निघताच सगळे एकदम गप्प झाले, कोणीच काहीच बोलेना, त्या बिचार्याला काहीच दाद मिळेना , उलट सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. साहजिकच होतं, १५ ऑगस्ट म्हणजे आपल्याला वारसहक्काने मिळालेली सुट्टी ...त्यात ती गुरुवारी आलेली,  शुक्रवारी  रजा टाकली की लगेच शनिवार- रविवार सुट्टी.  म्हणजे दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत मस्त एन्जॉय करायचा सगळ्यांचा प्लान होता. त्यामुळेच असल्या क्रांतीकारी, समाजहितकारक वगैरे फालतू गोष्टींसाठी कोणाला वेळ नव्हता, सबब अव्या ला रेस्पॉन्स म्हणून सगळे एकदम गप्प झाले. थोड्या वेळात अव्या चहा घेऊन निघून गेला , बाकीचे सगळे ही कामाला लागले , मी मात्र काहीसा अंतर्मुख झालो.

     मला आपल्या सगळ्यांच्या (भारतीयांच्या) मधल्या एका गोष्टीची फार गंमत वाटते. असा काही वेगळ्या मार्गाने जायचा कोणी विचार मांडला की त्याला उघडपणे कोणी विरोध ही करत नाही किंवा कोणी पाठिंबा ही देत नाही. सगळेजण एकदम गप्प बसतात ...अगदी पिनड्रॉप साइलेन्स .  बघा ना .. राज्यात दुष्काळाचे सावट आलेय , आम्ही आमच्या आमच्या बादल्या भरून गप्प. रस्त्यात कोणाचा आक्सिडेंट झालाय, आम्ही थोडासा चुकचुकाट करून गप्प. देशात बलात्कारचे प्रमाण वाढले ...आम्ही आमच्या दाराच्या कड्या लावून गप्प . तिकडे सीमेपालीकडचे नपुन्सक नराधाम  आमच्या मर्द जवानांची मुंडकी पैजा लावून पळवून नेतात , आम्ही डोळे मिटून गप्प. चाइना आमच्या भारत मातेचा पदर उडवून लावून सरळ सरळ अब्रू लुटायला बघतो , आम्ही तिकडे काणा डोळा करून गप्प. भ्रष्टाचाराच्या शर्यतीत आमचे राजकारणी दिवसेंदिवस सुवर्ण पदके पटकावतात, आम्ही त्यांच्या नावाने बोटे मोडून गप्प.
  
      मध्ये एकदा अण्णा हजारे नावाच्या पवित्र दीपस्तम्भाने आमच्या मुठी वळवायला आम्हाला भाग पाडले . धमन्यांमधून खरच रक्त धावतय आणि आपण खरच जिवंत आहोत असं वाटायला लागलं , प्रत्येकजण त्या  देवमाणसाच्या हाकेला  देत घरातून बाहेर पडला. इतक्यात सरकारने आपली विषारी खेळी खेळली, आन्णांवरतीच काहीतरी "जन्तर मंतर " केले, अचानक संघर्ष थांबला. भेद नीतीने सरकारने आंणांच्या सैन्याला भगदाड पाडले, बघता बघता आन्ंणांची टीम विस्कटली. स्वत:ला डेंगू चा डास म्हणवणारे केजरिवाल (स्वत:ची अतिशय योग्य पारख या गृहस्थानाच झाली आहे) आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून आपला एक राजकीय पक्ष स्थापन केला , तर तिकडे अण्णानि  आपल्या उरल्यासुरल्या निष्ठावंत (?) माणसांना सोबत घेऊन एक नवी फळी उभारली.

        या दरम्यान घराबाहेर पडलेली आमची पाऊले रस्त्यातच अडखाळली आणि पुन्हा आपापल्या घराकडे वळली. भरीस भर म्हणून  IPL  सुरू झाले आणि आम्ही "झाम्पिंग झापांग झम्पक झम्पक" च्या तालावर  नाचत नाचत (शी.. किती दळभद्रं गाणं होतं ते ) पुन्हा एकदा गप्प झालो .

     आजही काहीसं तसंच  झालं होतं. अव्यासारखी  देशासाठी आपापल्या परीने धडपडणारी माणसं आजही आहेत आणि ती आपल्या अवती भोवती वावारताहेत हे बघून मी मनातून सुखावलो होतो . पण त्याहीपेक्षा एक मोठं दु:ख माझं काळीज पोखरून काढत होतं. भविष्यात आव्यासारख्या लोकांना  जर अशी आमच्यासारखीच गप्प बसणारी, बोटचेपी माणसं भेटत गेली तर एक दिवस आव्यासुद्धा आमच्या सारखाच होईल. कदाचित "२६ जानेवारी ला काहीतरी उपक्रम राबवू ,  देशासाठी काहीतरी करू"  असं कोणीतरी म्हणेल तेव्हा आव्या ही हाताची घडी घालून गप्प बसलेला पाहायला मिळेल. दिवसेंदिवस मौज मस्तीच्या कैफात बुडालेली , नादान, मस्तवाल, आळासावलेली बुजगावणी  तयार करण्याचा कारखाना या हिंदुस्थानात अहोरात्र सुरू आहे या उपर दुसरे दुर्दैव ते काय ?

                                                                                                                                    --भालचंद्र


Monday, 3 June 2013

आला पाऊस गेला पाऊस


आला पाऊस गेला पाऊस
माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस

आज अंत हा पाहून गेला
उगा चौकशी करून गेला
दोन क्षणांची चुकली गणिते
पाठ पुन्हा ही फिरवून गेला
मला पावसा घाल अन्हिके

तुझे पोर हे असे लाडके
तुझीच माया तुझीच दुनिया
तुझेच सारे तुझेच खेळ
अंबरातुनी तुझ्याच त्याही
माझ्यासाठी हसला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस  ....

एकांती तव पैंजणा चे
भास होता क्षणोक्षणी
नकळत कानी गुंजन करिती
पुन्हा नव्याने जुनीच गाणी
नको सखी हा विरह आताशा
अंतरातुनी ओसांडून बघ
नसांनसांतून भिनला पाऊस

आला पाऊस गेला पाऊस
उनाड अल्लड लेकरापरी
ढगात पुन्हा दडला पाऊस

माझ्याकरिता माझ्यासोबत
चिंब एकदा भिजला पाऊस ...

                      --  भालचंद्र

Wednesday, 17 April 2013

वेध मनाचे: एक पत्र पावसाला

वेध मनाचे: एक पत्र पावसाला: प्रिय पावसा ,       बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे...

Tuesday, 16 April 2013

एक पत्र पावसाला


प्रिय पावसा ,
      बाबा रे , तुला काही लाज वगैरे वाटते की नाही ? किती दिवस झाले फिरकलाच नाहीस इकडे अजिबात. परवा माझी ४ वर्षाची भाची गाणे म्हणत होती " सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल काय ? " तेव्हाच तुझी आठवण आली. म्हटलं आज तुला पत्रच लिहून  विचारावं , कधी येण्याचा विचार आहे साहेबांचा ?

         महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तुला माहिती आहेच , पण मला त्याबद्दल नाही बोलायचं तुझ्याशी आज. महाराष्ट्रातल्या दुष्काळपेक्षा सुद्धा  खूप मोठा दुष्काळ पडलाय माझ्या मनात. खूप दिवस झाले रे हसता हसता रडून आणि रडता रडता हसून. पूर्वी हृदयाच्या कप्प्या कप्प्यातून आनंद- दुक्खा चे झरे वाहायचे गोड-खारट पाण्याचे... आता ते ही अगदी आटले  आहेत.  बाकी माझं अगदी उत्तम चालू आहे असं लोकं म्हणतात. माझ्याप्रमाणेच  ते ही  मनाने दुष्काळग्रस्त असावेत. माझ्या कोरड्या हसण्याला फसतात  ते सगळे. तसे हल्ली सगळेजण दुष्काळग्रस्तच भेटतात मला. कोणी हंगामी तर कोणी बारमाही. रोज उठून तेच दुष्काळी चेहरे बघायचा कंटाळा आलाय बघ . मध्यंतरी सरकारने खोटा खोटा पाऊस पाडायचा प्रयत्न केला तेव्हा थोडा आसावलो होतो मी. म्हटलं पाऊस पाडायला नाही जमलं तर निदान ढग तरी दाटून आणा थोडेसे. तेवढाच थोडासा रडून मोकळा झालो असतो मी. पण तो ही प्रयोग फसला नेहमीप्रमाणे. म्हणून मग आता म्हटलं डाइरेक्टच विचारावं तुला.
         खूप जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र एकटाच आहेस रे तू माझा . मागच्या पावसाळयापासून साचलेलं सगळं सांगायचं आहे तुला. खूप गोष्टी तुझ्याशी शेअर  करायच्या आहेत ज्या मी फक्त आणि फक्त तुलाच सांगू शकतो. तुला घट्ट मिठी मारुन कडकडून भेटायचंय मला. तू आलास की किती मस्त हुन्दडतो ना आपण सगळीकडे. तू म्हणशील तिथे म्हणशील तितका वेळ भटकत असतो मी तुझ्यासोबत. मागच्या वर्षी " राहिलेली मजा पुढच्या वर्षी " असं सांगून गेलास तीच राहिलेली मजा आता मला करायची आहे.
       आणि आलास ना या वेळी की नुसतं थेयिमान घाल. कोणाचंही काहीही एइकू नकोस. तुला माहितीये मी फक्त बाहेरून भिजत नाही. आतून , अगदी आतून प्रत्येक कप्पा न कप्पा चिंब झाल्याशिवाय मला तू आल्यासारखं वाटत नाही. तू भिजवलेल्या मातीचा गंध नसानसांतून भिनवल्याशिवाय मला जिवंत असल्यासारखाच वाटत नाही. 
   असो... आणि हो ,एकटाच येऊ नकोस. येताना "तिची" आठवण पण घेऊन ये आठवणीने. या वर्षी थोडी कमी आण , पण आणच. काय आहे ना, शरीराचं कितीही वय वाढलं तरी मनाचं वय नाही रे वाढवता येत. थोडी हूरहुर पण घेऊन ये झालंच तर. तिच्या ओल्या हातांच्या स्पर्शाचा भास मात्र नको आणूस ...का ते तुला आल्यावर सांगेन मी .सगळ्याच गोष्टी अशा पत्रात लिहीणे बरोबर नाही.
      या वर्षी आलास की मी तुला लवकर मात्र जाऊ देणार नाही . पुढच्या वर्षी तू परत येईपर्यंत पुरेल एवढा ओलावा माझ्या हृदयाला आणि मनाला दे आणि मग जा खुशाल हवं तर . आणखी एक म्हणजे हे पत्र तुला मिळेल तेव्हा नेहमीसारख ओलं ओलं नाही लागणार हाताला . अरे दाटून खूप आलंय रे पत्र लिहिताना पण मी रडणार मात्र नाही या वेळी . तसं ठरवलच आहे मी. म्हटलं  तू आल्याशिवाय आता रडायचच नाही अजिबात. तू आल्यावरच काय असेल ते होऊन जाऊ दे तुझ्यासमोर . म्हणून रोखून  ठेवले आहेत अश्रू तुझ्यासाठी.
       बर आता जास्त काही एमोशनल लिहीत नाही. लवकर ये आता इकडे. आणि यायच्या आधी कळव नक्की मला . मागच्या वर्षी सारखा असा अचानक दारात येऊन उभा राहू नकोस . काही सुचत नाही रे तू असा एकदम आलास की . अगदी कावराबावरा  होउन जातो मी . मी तुला न्यायला येइन यंदा माझ्या नवीन बाइक वरुन .तिथेच आपल्या नेहमीच्या टेकडीवर . आई ला पण सांगून ठेवलंय मी तुझ्या आवडीची कांदा भजी करायला. आता जास्त वाट पाहायला लावू नकोस आणि ये बरं पटकन .

तुझा आणि फक्त तुझाच बारमाही पावसाळी मित्र. :)
भालचंद्र

मागेच उडाले होते


घरट्यासाठी परक्यांच्या आयुष्य वेचले ज्याने
घरट्यातील तयाच्या पक्षी उदास होते

कवड्या उदरतेच्या माझ्यावर उधळल्या त्याने
माझ्याकडेच ज्याचे सारे उधार होते

बहरोनि मग त्याने आकाश चुंबिले जेव्हा
मानकरी यशाचे खालीच राहीले होते

हा कोणत्या युगाचा दाविलास मज चेहरा
सारीच श्वापदे अन् माणूस कोण नव्हते

चित्र हे उद्याचे जरी आज काढतो मी
रंग तयातील आवडते मागेच उडाले होते

                                  -- भालचंद्र भुतकर


Saturday, 16 February 2013

डायरी

माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
आक्ख्या जगात एक तीच तर होती
जी माझं सगळं शांतपणे एइकून घ्यायची
मी कसाही वागलो किती ही वैतागलो
तरी रोज रात्री अलगद माझ्या हाताखाली यायची

सगळ्यांपासून लपवून
एक मोरपीस मी तिला दिलं होतं सांभाळायला
खूप समजूतदार होती ती
कधी अत्यानंदाचे क्षण मला मिठीत घेऊन तिने स्वतःत उतरवले होते
तर कधी मला शब्द देऊन तिने दुक्खाना सावरले होते
माझे सगळे हिशोब वगैरे पण तीच बघायची
थोडी ताटातूट चालायचीच
पण ती ही निमूटपणे सगळं पाहायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

बोलली नाही ती कधी मला
पण लपून छपून ती ही माझ्यावर प्रेम करायची
स्वतःच्या आयुष्यातील काही पाने तिने मुद्दाम कोरी ठेवली होती
माझ्यासाठी...
मी ही मग त्यावर कधी हिशोब मांडायचो नाही
अशी सगळी गंमत चालायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

कधी कधी मला खूप भरून यायचं
अगदी आतून आतून तुटायचं
खूप एकट एकट वाटायचं
तेव्हा ही असायचीच सोबत
अगदी पहाडासारखी खंबीर माझ्या बाजूला
माझ्या डोळ्यातल्या सरीना तिनेच तर आंगण दिले होते
मुक्तपणे बरसायला
अश्रूनी पुसल्या गेलेल्या माझ्याच शब्दांचे अर्थ
मलाच कानात येऊन सांगायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......

एकदा रात्री मी नशेत असताना
मला ती सोडून गेली
माझे मोर पीस मात्र आठवणीने देऊन गेली
सालाबाद प्रमाणे मी ही तिला विसरून गेलो
नव्या संकल्पांच्या जोशात तिला कुठेतरी सोडून आलो

परवा घर आवरताना अचानक
पोटमाळ्यावर मला ती दिसली
माझ्याप्रमाणे ती ही आता म्हातारी झाली होती
पण तरी ही अगदी अगदी ओळखीचं हसली
मी तिला हातात घेतलं
माझ्या पाणावलेल्या डोळ्या ईतकेच
तिचे काठ पण थोडेसे ओलावले होते
एवढी वर्षं निघून गेली पण तरीही
तिची सवय गेली नव्हती
माझ्या मनातलं किती अचूक ती ओळखायची
माझी एक डायरी मला खूप खूप आवडायची......
                                     
                                                --  भालचंद्र भुतकर

Saturday, 26 January 2013

एक साथ


तुझे पाने की मन्नत
और जमाने का डर
आजकल एक साथ ही आते है

आए तो थे कई बार
तुझे अपने दिल का हाल बताने
तेरे ज़ुल्फो की शाखो मे लिपटे
अपने घायल दिल को छुड़ाने
मगर क्या बताए जानेमन
तेरा दिल जीतने की मेरी आरजू
और मुझे हराने की तेरी ज़िद
आजकल एक साथ ही आते है

वो झुकी पलकों के अफ़साने
वो होटो की नज़ाकत
वो गालों पे दमकती हुई हसीं
और आँखों की शरारत
बचना तो लाख चाहा था हमने
इन कातिल अदाओंसे
मगर क्या बताए जानेमन
नज़रोंसे घायल करने की तेरी शिद्दत
और उसपे मर मिटने की हमारी हरकत
आजकल एक साथ ही आते है

कभी हमने भी सोचा था
सब छोड़ कर कहीं दूर चले जाएँ
तेरी गलियों से निकलकर
अपनी गलियों मे लौट आए
मगर क्या बताए जानेमन
शराब छोड़ने की हमारी चाहत
और आँखों से पिलाने की तेरी आदत
आजकल एक साथ ही आते है

-- भालचंद्र भुतकर