परवा माझा शिर्डीला जाण्याचा योग आला. शिर्डी म्हणजे अर्थातच श्री साईबाबांचे गाव , माझ्या बहीनीची साईबाबांवर प्रचंड श्रद्धा . त्यामुळे तिच्यासोबत माझा पण शिर्डीला जाण्याचा योग आला.
पुण्यापासून शिर्डी म्हणजे साधारण २०० कि. मी. च्या आसपास. ओवरनाइट जर्नी करून आम्ही अगदी पहाटे पहाटे शिर्डी ला पोचलो. आदल्या दिवशी दिवसभर ऑफीस मध्ये दमलेलं होतो, त्यात रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. अर्धवट झोपेचा चांगलाच प्रभाव माझ्या चेहऱ्यावर दिसून येत होता. माझे सुजलेले डोळे, विस्कटलेले केस आणि पारोसं ध्यान यावरून माझी "अवस्था" कोणाच्या ही सहज लक्षात येईल अशी होती. शिर्डी मधल्या गर्दीने पहाटेच्या सुंदर , प्रसन्न वातावरणाला थ्रेड लावला होता. एक विचित्र , नकोनकोसं वाटणारं उबट वातावरण मनाला अस्वस्थ करत होतं . त्या गर्दीतून वाट काढून बरोबर आम्हालाच शोधून काढून त्रास देणारे " साब रूम चैइये क्या साब ? " असं घाणेरड्या टोन मध्ये विचारणारे लॉज वाल्यांचे चे दलाल आणि गुलाबाची फुले विकणारी , तोंडातून लाल पिंक रस्त्यावर बेधडक मारणारी माणसं माझी चिडचिड वाढवायला पुरेशी होती. या सगळ्यांना एकेरी झुंज देत मी आणि माझी बहीण साधारण ६ च्या आसपास दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग मोठी होती , दीड दोन तासांचा सहज चुराडा होणार होता, आणि माझ्या संयमाची परीक्षा घेतली जाणार होती. मी थकलेल्या , वैतागलेल्या , त्रासीक मुद्रेने रांगेत उभा राहिलो , आम्ही पाच पाच मिनिटांना जांभया देत , शरीराला रेलिंग चा आधार देत हळू हळू रांगेतून पुढे जात होतो. गर्दी प्रचंड होती, मी ती गर्दी न्यहाळत , स्वत:च्या संयमाचा तोल सांभाळत असताना बर्याच जणांच्या हातात गुलाबाची फुले असलेलं लक्षात आलं. जसं गणपतीला दुर्वा आवडतात, शंकराला बेलाची पाने आवडतात, तसं साईबाबांना गुलाब आवडत असावेत असा एक अंदाज मी एक जांभई देता देता बांधला.
पहाटेची वेळ असल्यामुळे रात्रीच्या प्रवासातून आलेली बरीच मंडळी त्या गर्दीत होती, त्यापैकी काही जण रात्रीचं जेवण अजीर्ण झाल्याचा पुरावा बेधडक पणे देत होते. रांग पुढे जाईल तशी मागची माणसं रांग तोडून पुढे जाउ पाहायची मग बाकीचे लोक त्यांना शिव्या देऊन परत मागे यायला भाग पाडायचे. मधूनच कोणीतरी " सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ..." असं जोरात ओरडायचं मग बाकीचे सगळे " जय ..." असं त्याच टेंपो मध्ये ओरडायचे . काही जण " ओम साई नमो नम: , श्री साई नमो नम: , सद्गुरू साई नमो नम: , जय जय साई नमो नम: " असं एका विशिष्ठ चालीत म्हणायची . ही सगळी गंमत पाहत मी त्या रांगेतून आपोआप पुढे सरकत होतो .
चालता चालता म्हाताऱ्या माणसांना, बायकांना ते थकल्यानंतर बसण्यासाठी म्हणून बेन्चेस ठेवले होते , अशाच एका बेंच वर मी थोडा वेळ बसलो आणि क्षणभर डोळे मिटले. अचानक माझ्या मेंदूमध्ये एक विलक्षण वीज चमकलि , डोकं गरगरायला लागलं, दरदरुन घाम फुटला , छाती चे ठोके वाढले , हार्ट अटॅक येतोय की काय असं वाटून मी डोळे उघडले आणि बघतो तर काय ...माझ्या समोर रेलिंग च्या नळीवर साक्षात साईबाबा बसले होते . मी चक्रावलो , वेडावलो , अस्वस्थ झालो आणि मोठ्याने ओरडणार इतक्यात ते मला म्हणाले " बाळा ...घाबरू नकोस , ओरडु पण नकोस, मी साई च आहे आणि सध्या फक्त तुलाच दिसतो आहे, इतर कोणालाही मी दिसत नाहीये , थोडं पाणी पी आणि शांत हो , तू शांत झालास की मग आपण बोलू. " मी माझ्याजवळची पाण्याची बाटली काढली आणि घटा घटा पाणी घशात ओतलं , रुमालाने घाम पुसला मग थोडा नॉर्मल ला आलो. साईबाबा माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते . मी पण उत्तरादाखल थोडासा हसलो, म्हणालो " बाबा, तुम्ही इकडे कसे काय ?"
साईबाबांनी त्यांची पेटंट मळकी, पांढरी कफनि घातली होती, डोक्याला टिपिकल पांढरा बंडाना बांधला होता. क्षणभर माझ्या मनात विचार येऊन गेला... साईबाबांनी निदान आता तरी असं राहायला नको , त्या वेळची त्यांची परिस्थिती हलाखीची होती , ते गरीब होतें पण आता त्यांची प्रत्येक छोट्या मोठ्या गावात मंदिरे आहेत, स्वत:ची भरपूर इस्टेट आहे, अंबानी बंधूंना लाजवेल एवढी संपत्ती आहे, आता तर त्यांनी मस्त, सूट बूट घालून दाढी वगैरे चकाचक करून कसं मस्त निवांत राहायला हवं. असा मध्यमवर्गीय विचार माझ्या मनात सुरू असतानाच बाबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं...
"अरे मी इकडेच असतो राजा , तू इकडे कुठे ते सांग ."
"अं ..हां हां हां " मी विचारांच्या तन्द्रितुन बाहेर येऊन उगाचच हसलो आणि म्हणालो ..." अहो म्हणजे तसं नाही , एवढी सगळी लोकं तुमच्या दर्शनासाठी रांगेत उभी आहेत, खूप लांबून ते तुमच्या भेटीसाठी आलेली असताना तुम्ही ऑफीस (गाभारा) सोडून इकडे कुठे फिरताहात "?
साईबाबा मनापासून हसले आणि मला टाळी देत म्हणाले "चांगलीच फिरकी घेतोयस हां माझी ".
"अहो मी काय तुमची फिरकी घेणार ? मलाच इथे रांगेत उभं राहून चक्कर यायची वेळ आलीय , रात्री झोप पण नाही झाली व्यवस्थित , तुमचं काय बाबा सोन्याच्या सिंहासनावर बसून तुम्ही आपल्या भक्तांची गंमत फक्त पाहत असता", मी थोडासा त्रासीक स्वरात बोललो.
बाबा-" अरे मी त्या गाभाऱ्यात नसतो हल्ली , तिथे खूप गुदमरतं मला , सुरुवाती सुरुवातीला असायचो मी तिथे , भक्तांच्या डोळ्यात श्रद्धा , सबुरी पाहून खुश व्हायचो , माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं मला , पण हल्ली खूपच बाजारीकरण झालंय रे सगळं , पाच मिनिटं पण त्या गाभाऱ्यात मन लागत नाही, पहाटे पासून रांग उभी असते दारात , पण एकाच्या ही मनात श्रद्धा, सबुरी पाहायला मिळत नाही, ", बाबा हळहळून सांगत होते.
"अरे या लोकांनी माझ्या समाधी स्थळावर माझा पुतळा बसवला , त्याला सोन्या चांदीने मढवलं , आयुष्यभर भिक्षा मागून, फाटके, मळके कपडे घालून, भौतिक सुखापासून जाणून बुजून दूर राहिलेल्या माणसावर या लोकांनी मेल्यावर मात्र हर एक भौतिक सुखाची उधळण केली, वा रे वा ...काय ही श्रद्धा ..माझ्या वागण्यातून, बोलण्यातून मी नेहमी समता, बंधुता , प्रेम या गोष्टींचा अवलंब केला, गरीबीने , परिस्थितीने गांजलेल्या लोकांची या हातांनी जन्मभर सेवा केली, काय संदेश दिला मी तुम्हाला माझ्या जगण्यातून ? " बाबा खूप पोट तिडिकीने बोलत होते.
" आजच्या या रांगेत एकूण २३ मोठे व्यापारी आले आहेत, मी त्यांना चांगलाच ओळखून आहे कारण त्यांनी मला त्यांचा बिज़्नेस पार्ट्नर बनवला आहे. "
" बिज़्नेस पार्ट्नर ? हा काय प्रकार आहे ? ", मी एकदम चक्रावून जात विचारले.
अरे बाबा मोठे मोठे बिज़्नेसमन माझ्या पुढे येऊन लेखी करार करतात आणि त्यांच्या बिज़्नेस मध्ये भागीदारी देऊ करतात, त्यांचा असा समज आहे की साई ला पार्ट्नर केला म्हणजे साई कृपेमुळे धंदा बुडणार नाही आणि नुकसान झालेच तर साहजिकच त्याचा फटका मला ही बसेल आणि मी माझा फायदा वाढवण्यासाठी त्यांचा धंदा वाढीस लावेन" .
" बाबा, तुम्ही हे असं पण करता "? मी
" अरे नाही रे ...मला काय कळतय त्यांच्या बिज़्नेस मधलं ? मी एक साधा फकिर, भिक्षुक, अडाणी... मी कशाला त्यांच्या धंद्यात ढवळाढवळ करू"?
"मग तुम्ही त्यांना शिक्षा का करत नाही" ? मी बोललो .
"हा हा हा ...अरे मी त्यांना शासन करणारा कोण ? मी स्वता: या पृथ्वीतलावर माणूस म्हणून जन्माला आलो, भगवंता च्या कृपेने मोक्ष प्राप्तीचा मार्ग मला समजला , म्हणून त्या मार्गाने आयुष्यभर चाललो , चालता चालता वाटेत भेटणाऱ्याना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यागाचं महत्व पटवून दिलं, सबका मालिक एक असा संदेश मी माझ्या सहकाऱ्यांना दिला, आणि शेवटी आनंदाने माझा देह सोडून मी निघून गेलो, तर यांनी मलाच देव बनवलं , माझ्यासमोर रोज लोटांगणं घालायला लागले, यांच्या आयुष्यात घडणाऱ्या तथाकथित सुख -दुक्खांच्या प्रसंगांसाठी मला कारणीभूत धरू लागले.
मोठे गंमतीशीर वागतात हे लोक. म्हणजे एखाद्या विवाहित दांपत्याला लग्नाच्या ५ वर्षांनतर मूल झालं याला कारण त्यांनी शिर्डीला येऊन ५००१ रु. अर्पण केले हे . पुढे तो मुलगा मोठा झाला आणि परीक्षेत नापास झाला तर याला कारण काय तर बरेच दिवस शिर्डीला नाही गेला ...एकदा जाऊन ये म्हणजे होशील पास .
आता हे तुम्हा लोकांच्या तरी सद्सद्विवेक बुद्धी ला पटताय का ?
पहिली गोष्ट - रुपये ५००१ हा माझा मूल जन्माला घालायचा रेट कोणी ठरवला ? आणि समजा उद्या उठून हा ५००१ रुपयांचा मुलगा दीड दमडीचा चोर बनला तर यात दोष कोणाचा ?
दुसरी गोष्ट - तुमचा मुलगा वर्षभर अभ्यास करून सुद्धा एम. बी. ए. ची परीक्षा पास होत नाही तर हा अडाणी साई तिथे काय करू शकणार आहे ?
मी साईबाबांचा सेन्स ऑफ ह्यूमर बघून मनापासून हसलो. आता आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. एकमेकांना टाळ्या देत आम्ही त्या रांगेतून पुढे जात होतो. सगळंच एकदम अनाकलनीय आणि अविश्वसनीय सुरू होतं. बघा ना साक्षात साईबाबा माझ्यासोबत त्यांच्याच मंदिरातल्या दर्शनाच्या रांगेत उभे राहून गप्पा मारत होते आणि सबंध रांगेत या कानाची त्या कानाला खबर होत नव्हती , साईबाबा आणि माझ्या वयामध्ये किमान दीड शतकाचं अंतर होतं पण मला अगदी ते माझ्या कॉलेज मधल्या मित्राप्रमाणे वाटत होते. मी पण सगळा थकवा , त्रास विसरून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो.
मी - बाबा , हा सगळा ढोंगीपणा तुम्ही रोज पाहता , तुमचं काळीज अगदी क्षणक्षणाला तुटत असेल ना ?
साईबाबा - आधी खूप त्रास व्हायचा सगळ्या गोष्टींचा पण आता सवईच झालंय सगळंच , मी आता गंमतीत घेतो सगळं.
मी- पण असं सगळ्याच गोष्टी गंमतीत घेऊन कसं चालेल ?
साईबाबा - अरे आयुष्यात कोणी कसं जगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं आयुष्याला समजावून घेत जीवन जगत असतो. आणि त्या मार्गाने त्याला हवे ते मिळवायचा प्रयत्न करत असतो . कोणीही कसेही वागले म्हणून सृष्टीचे नियम बदलत नाहीत , आजही झाडावरून परिपक्व झालेलं फळ आनंदाने आपोआप जमिनीवरच पडतं , आभाळातून रिमझिमणार्या सरींनी आंगण भरलं की आजही प्रत्येकाच्या मनात आशेची कळी उमलतेच, सूर्य नारायण रोज आजही नित्यनेमाने उगवतोच.
या जगात कोण काय करतं यावरून कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही , लहान- मोठा , गरीब - श्रीमंत , सुख-दु:ख हा भेदभावच मुळात अतिशय अनैसर्गिक आणि दिशाभूल करणारा आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून तिचं अस्तित्व हे सगळ्यांसाठीच एक गूढ बनून राहिलं आहे. पण या सृष्टीचे काही अलिखित नियम आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे माणसाचा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो, अशा नियमांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासारख्याच काही व्यक्तीनी या पृथ्वीवर केला.
कुंडीमध्ये लावलेलं रोपटं थोडासा सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी मिळालं की कसं तरारून फुलतं , आनंदाने डोलू लागतं , त्याच्या आयुष्याचा हेतूच मुळात आनंद घेणे हा असतो , पण त्याच्या नकळत ते इतरांना आनंद देत असतं , जगणं शिकवत असतं . त्याच्याकडे पाहून जो शिकला तो शिकला , कोणी नाही शिकलं म्हणून ते रोपटं आनंद घेणं सोडत नाही . म्हणूनच माणसाने आपलं कर्म करून शांत राहायचं असतं , हेच कारण आहे की मला या सगळ्याचा राग येत नाही , कधी कधी वाईट वाटतं एवढंच .
मी तंद्री लागल्यासारखा बाबांचा प्रत्येक शब्द कानात साठवून घेत होतो.
"मी कोणी देव नाही किंवा संतपुरूष ही नाही, ही विशेषणे मला तत्कालीन समाजाने लावली. "
मी भारावून गेलो होतो , मी बाबांना म्हणालो " बाबा, माझ्यासाठी काही आज्ञा असेल तर सांगा, समाजासाठी काही तरी करायची माझी ही ईछा आहे.
बाबा हसून म्हणाले " बाळा , एवढाच कर , मी जे तुला सांगितलं ते तुझ्या जवळच्या नातेवाईकांना , मित्रांना सांग. या फकिराचे मनोगत सगळ्यांना कळूदे . मी श्रीमंतांचा , गुन्हेगारांचा साई नसून मी गरीबाच्या अश्रू मधून ओघळणारा थेंब आहे, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात मी आहे
लहान मुलाच्या उत्साहात मी आहे , जिथे जिथे निखळ ,नि:स्वार्थी, शुद्ध प्रेम आहे तिथे तिथे मी आहे , तुझ्यात मी आहे, माझ्यात मी आहे , आपण सारे एक आहोत , मला भेटण्यासाठी कोणालाही शिर्डीला यायची गरज नाही , या जगाकडे जो प्रेमाच्या नजरेने बघेल त्याला स्वत:च्या नजरेत मी दिसेन. माझा हा संदेश तू सगळ्यांना दे.
मी भरून आलेल्या अंत:करणाने त्या युग पुरुषाकडे बघत होतो.
अचानक माझ्या मागून एक आरोळी ऐकू आली, " बोला सद्गुरू श्री साइनाथ महाराज की ....जय !!!" आणि मी भानावर आलो . इतका वेळ चाललेलं सगळं स्वप्न होतं . मी खडबडून पाहिलं तर गाभारा जवळ आला होता , लोकांचा उत्साह द्विगुणित झाला होता, मी साईबाबांच्या गाभाऱ्याच्या एग्ज़ॅक्ट बाहेर उभा होतो .
पाणावलेले डोळे, भरून आलेले अंत:करण आणि समोर साईबाबा , असा तो सोहळा होता. माझ्या मागे उभ्या असलेल्या एक बाई मला धक्का मारुन आत ढकळत होत्या ,
मी म्हटलं " एक मिनिटं काकू मला रांगेतून बाहेर जायचंय ". असं म्हणून मी रेलिंग च्या खालून वाकून रांगेतून बाहेर आलो.
"अरे पण दर्शन "? मागच्या काकू आश्चर्याने म्हणाल्या
"माझं दर्शन मघाशीच झालाय काकू , आता खूप कामं आहेत मला … असं वेळ वाया घालवून चालणार नाही , गाभाऱ्यातलं सोन्याचं सिंहासन खूप छान आहे म्हणतात , तुम्ही बघून या आणि सांगा मला कसं आहे ते, बाकी रांग लावून बघण्यासारखं काही उरलं नाहीये तिथे आता.
शिर्डीला जाताना मी रिकामा गेलो होतो पण पुण्यात परत येताना माझ्याकडं भरपूर काही होतं सांगण्यासारखं , लिहिण्यासारखं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्यासारखं ...जणू काही जगातला मी सर्वात श्रीमंत माणूस झालो होतो .एवढं सगळं मला दिलं होतं ...एका फकिराने,
--भालचंद्र