Thursday, 4 September 2014

निनावी

प्रत्येक नात्याला नाव दिलेच  पाहिजे असे नाही
काही नाती असू द्यावीत निनावी
नाव आलं म्हणजे त्याला बंधनं आली

अपेक्षांच्या , स्पर्शाच्या , शब्दांच्या भिंती आल्या
शरीराचे, विचारांचे   उंबरे आले

हिरव्याकंच वनराई मध्ये पडलेल्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याने दिसावे
कधी त्याने फुलपाखरू होऊन हृदयरूपी फुलांवर स्वैर बागडावे
तर कधी झाडावरचे पान होऊन स्वेच्छेने अलगद  जमिनीवर पडावे …
अशा वेळी आपण काहीच करू नये
फक्त  बघत राहावं …अत्यंत कौतुकाने
तरळू द्यावं डोळ्यात पाणी … अतिशय आनंदाने
अशा वेळी शब्दांची जुळवाजुळव करूच नये मुळी …
डोळे बंद करून फक्त श्वासोच्छ्वास जमवावा
त्याचा सुगंध आपल्या श्वासा श्वासा त भिनू द्यावा

जन्म सार्थकी लागला असे समजावे
फक्त एक नाते निनावी असू द्यावे

--भालचंद्र

Sunday, 13 July 2014

शोध अस्तित्वाचा

 रोज सकाळी अंथरुणातून उठताना जाणीव होते छाताडावर नाचणाऱ्या माझ्याच अगणित अस्तित्वांची . जणू काही मी डोळे उघडायचीच वाट  बघत रात्रभर माझ्या अवतीभवती ते सगळे वावरत असतात आणि मी डोळे उघडताक्षणीच माझ्या उरावर असंख्य प्रश्नचिन्ह घेऊन  नाचायला लागतात.  हे आता सवयीचं होऊन बसलंय. रक्तपिपासू जळवान्प्रमाणे माझ्या मनाला चिकटून बसलेल्या या अस्तित्वांच्या प्रश्नांना तोंड देता देता माझ्या तोंडाला फेस येतो.

प्रश्न असा पडतो की , मी नेमका आहे तरी कोण ?

आतून कुठूनतरी एक ठरलेले उत्तर येते ...  इंजीनियर, लेखक, मित्र, भाऊ, मुलगा, प्रियकर, खेळाडू, हिंदू, माणूस, देव, राक्षस इत्यादी इत्यादी हजारो बरोबर उत्तरांपैकी एक उत्तर आपली बाजू मांडत काही काळ रेंगाळत राहत मनभर. दिवसभराच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी वेगळा वेगळा असल्याचा शोध लागतो माझा मलाच. सकाळी उठल्यानंतर मी  सुजाण  समाजातील एका सुशिक्षित कुटुंबाचा एक भाग असतो. त्यातही मुलगा, भाऊ, मामा, काका इत्यादी शेकडो उपप्रकार आहेत. उदरनिर्वाहाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर मी एक मध्यमवर्गीय , प्रामाणिक असा नोकरदार असतो. त्यातही कोणासाठी जुनिअर , कोणासाठी सिनिअर , कोणासाठी अतिमहत्वाचा तर कोणासाठी अतिसामान्य अशा क्याटेगरीज आहेत. संध्याकाळच्या वेळी मित्रांसोबत चहा घेत  गप्पा मारताना मी एक प्रेमळ, विश्वासू मित्र असतो

       असा दिवस निघून गेला की वाटत एक अख्खं आयुष्य निघून गेलं. रात्री, अंगावरचे कपडे खुंटीवर टांगताना कपड्यांसोबत मी मलाच टांगत असल्याचा भास होतो. त्याच खुंटीवर काही वर्षांनी एक म्हातारी काठी टांगत असल्यासारख वाटत, तर आणखी काही वर्षांनी मी स्वत:च फोटो बनून लटकत असलेला सुद्धा दिसतो. त्या फोटोतल्या "मला" सुद्धा कितीतरी अस्तित्वे लगडलेली असतात- कुणाचा आजोबा, कुणाचा बाप, कुणाचा मित्र, तर कुणाचा शत्रू, कुणासाठी निष्फळ , निरुपयोगी, उपद्रवी, किरकिरा म्हातारा, तर कुणासाठी प्रेमळ, आनंदी, निस्वार्थी , दयाळू  देवमाणूस.

आता मी नेमका कोण आहे याचा शोध घेत घेत मन खोल जाऊ  लागत, जितक खोल जाइल तितकंच सारं फोल वाटू लागत. संभ्रमावस्थेत मग मी देवघरात जतो. तिथेही  तीच परिस्थिती - स्थितप्रद्न्य ,शांत , निश्चल अशा अनेक प्रतिमा तिथे धूळ खात पडलेल्या दिसतात , प्रार्थनेला त्यांच्यापैकी कोणाला निवडावे हा एक निराळा प्रश्न.

      तिथून उठून मी घराबाहेर पडतो , तर देवळात जावे कि मशिदीत, चर्च मध्ये कि गुरुद्वारामध्ये असे विविध प्रश्न उभे असतात माझ्या दारात. देऊळ हा ऑप्शन निवडला , तर पुन्हा कोणत्या देवळात ? हा मागोमाग येणारा प्रश्न.

 छ्या …. साला सगळच खोट  आहे , सगळच व्यर्थ आहे , मर्त्य आहे मर्यादित आहे . अमर्याद आहेत त्या फक्त माझ्या शंका आणि माझ्या पाचवीला पुजलेल्या अस्तित्वांच्या रांगा . मग अस्वस्थता, चिडचिड , स्वत: शी भांडण असे रोजचे  ठरलेले  कार्यक्रम झाले की कधीतरी मी हताश , निराश होऊन डोळे मिटून पडतो आणि अचानक शोध लागतो मला स्वत्वाचा . मला उत्तर मिळून जात ... "मी" कोणीच नाहीये , मुळात "मी" हि संकल्पना च खोटी आहे.
आहे तो फक्त प्रवास , तिमिरातून तेजाकडे, अनंतातून अनंताकडे, क्षितीजाकडून क्षितिजाकडे . मेल्यानंतरही न सुटणारी अशी चिकट अस्तित्वे आयुष्यभर कमावल्यानंतर त्यातलं एक तरी अस्तित्व कोण्या एकाच्या  तरी आयुष्यभर लक्षात राहील असे जगावे असे मला वाटते.

कारण...  खुंटी तशीच राहील तिथे , बाकी खुंटीवरचे  कपडे, काठ्या , फोटो आणि दृश्य- अदृश्य स्वरूपातील नादान , निर्लज्ज अस्तित्वे बदलतच  राहतील पिढ्यान पिढ्या ,युगानु युगे …

गर्दीत माणसांच्या हरवून जन्म गेला
नुसत्याच येरझाऱ्या, घालून जन्म गेला

--भालचंद्र जयप्रकाश भुतकर

Monday, 7 July 2014

असे जीवनाचे ऋतू फार आले
पुन्हा आसवांचे  हसे फार झाले
तसा सावराया मला  मीच होतो
जरी जीवघेणे असे वार झाले

तुझ्या वेदनांचे ठसे व्यर्थ काही
तुझ्या यातनांचे मुके अर्थ काही
जगी वावराया , पुरे एवढेसे
तुझ्या सोबतीची मला आस नाही

कसे काय सांगू ,जपतो उराशी
कसे दु:ख माझ्या भिजते उशाशी
तरी बोललेलो , कितीदा तुला मी
नको खेळ खेळू असे काळजाशी

जरी वादळे ही  सदोदीत देवा
कधी थांबलो ना तुझ्या पायरीला
नसे वाकण्याचे स्वभावात माझ्या
असे मोडलेला कणा सोबतीला

--भालचंद्र

Monday, 30 June 2014

अस्तित्व

आज सकाळी मला जाग आली तेव्हा
अंथरुणात पडलेल्या अस्तित्वांच्या गाठोड्याकडे लक्ष गेले
त्या गाठोड्यात प्रत्येक अस्तित्वासोबत
रंगी-बेरंगी बुरखे ठेवले होते कुणीतरी …बहुतेक मीच

संभ्रमावस्थेत एक बुरखा मी उचलला इतक्यात
दुसर्याने नाराजीचा सूर आळवला
दुसर्याला हातात घेताच तिसर्याने डोळे वटारले
वैतागून मग सगळे बुरखे तिथेच टाकून तडक उठलो अन ध्यानात आले
पायात बेड्या ठोकल्या होत्या कुणीतरी …बहुतेक मीच

गडबडीने खिसे चाचपुन एक किल्ली काढली
बेड्या सोडवायचे लाख प्रयत्न केले , मग आठवलं
भूतकाळाच्या कुलुपांना भविष्याची किल्ली लागत नाही
थकलो, रडलो , कुलूप तुटतंय का बघून झालं
माझ्या प्रत्येक घावानिशी अधिकाधिक मजबूत होत चाललेल्या त्या बेड्या माझ्यावर हसू लागल्या
मी हताश , निराश तसाच पडून राहिलो काही काळ

जाग आली तेव्हा माझ्याच कर्तृत्वाची दुर्गंधी पसरली होती घरभर
आता मात्र निकराने आळस झटकून उठलो
निश्चयी मुद्रेने सगळ्या बुरख्यांची घडी घालून व्यवस्थित ठेवले
उशीखाली हात फिरवला , एक किल्ली मिळाली
सगळ्या बेड्या एका झटक्यात सुटताना कळलं कि
वर्तमानाची किल्ली सगळ्या कुलुपांना लागते

सारं सामान एका पोत्यात भरून पाठीवर टाकलं
उशाशी पडलेला हसरा मुखवटा उचलला आणि दणकट पावले टाकत मी चालू लागलो

अस्तित्वाची लढाई मी रोज अशीच
कर्तव्याच्या ढाली ने नि नाईलाजाच्या तलवारीने
आजवर जिंकत आलोय

---भालचंद्र 

Wednesday, 4 June 2014

कविता

चंद्र , सूर्य , तारे,
फुले, पक्षी, झाडे
डोंगर दऱ्या नि समुद्र सारे 
सगळे जिथल्या तिथे ठेवूया 
आणि मग एक कविता लिहूया 

कशाला हव्यात सुख दुक्खांच्या कुबड्या 
अन कशाला हवीय ती ?
आठवणी वगैरे दाटून बिटून येउदेत कि यायच्यात तेव्हां 
कुंथून कुंथून किती शब्द हागणारेस ?
स्वर, व्यंजन, वृत्त, मात्रा , अलंकार
एवढेच काय तर शब्द च सारे बाजूला ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

वाहवा नि टाळयांचा मोह आवर थोडासा
स्वत्व सोडून गेलेल्या स्वत:ला सावर थोडासा
यमक छन्द जुळवशिलच की शेकडो बरी बुरी
एक तरी ओळ लिही लेका खरी खुरी
आयुष्याच्या शाईने जगणे लिहू थोड़े थोड़े
बाकी कागद सारे कोरेच ठेवूया
आणि मग एक कविता लिहूया

जखमा आणि वेदनांचे सूर आळवलेस किती
दिसू नए कोणाला म्हणून
ओघळलेले आश्रू वाळवलेस किती
देण्या घेण्याचा हिशोब होइल च की ढगात
आपण खाली फ़क्त जगणे शिकून घेउया

सूर्य चन्द्र तारे
फुले पक्षी झाडे
डोंगर दरया नि समुद्र सारे
सगळे जिथल्या तिथे ठेवुया
आणि मग एक कविता लिहूया

--भालचंद्र

Thursday, 20 February 2014

अंधारवाटा

मनाचे सगळे दरवाजे बंद असताना
एक छोटीशी फट शोधून
 आतमध्ये शिरतो ..एक तेजस्वी किरण
मी अंधारप्रिय... डोळे मिटून घेतो
तो ही हट्टी ...मिटलेल्या डोळ्यांतून ही आत शिरतो
मग मी बेचैन होतो , अस्वस्थ होतो
चिडून पुन्हा एकदा सगळे दरवाजे घट्ट लावून घेतो
तो शांत ,स्थिर ...आणखी प्रखर होतो
मग मी त्याच्याशी भांडतो
हात पाय झाड़त भोकाड पसरतो
तो तिथेच ....
थोड्या वेळाने मी शांत होतो
थकलेल्या निराश हातांनी
सगळे दरवाजे उघडतो
चहू बाजूंनी मग तो आत शिरतो
आणि माझ्या कोपरया कोपऱ्यात पसरतो
मी बिथरतो, घाबरतो, वेडापिसा होतो
शेवटी ज्याची भीती होती तेच घडत असतं
मी हताश ,केविलवान्या नजरेनी माझ्या जखमा कुरवाळतो
इतके दिवस अंधारात दडलेल्या
 माझ्या दु:खांच्या लक्तरांचे गाठोडे काखेत बांधून
त्याच्याकडे पाठ फिरवतो
आणि चालू लागतो पुन्हा
नव्या अंधाराच्या शोधात ...नव्या वाटेने ...नव्या जोमाने

                                                        --भालचंद्र

Wednesday, 5 February 2014

रोजचंच झालंय

संध्याकाळच्या वेळी नेहमीच्या त्या ठिकाणावर तू येणार म्हणून
त्याच ठिकाणी एक आडोसा बघून मी उभा असणार
तुला मी दिसणार नाही हे ठाऊक असलं तरी
तू येण्याची वेळ झाली की काळजाचा प्रत्येक ठोका चुकणार
भर थंडीत मला घाम फुटणार
आज तुला अडवून मानातलं सगळं सगळं सांगायचं,
तिच्यायला बास ....लय झालं आतल्या आत कुढायचं
तुला पाहिल्यावर रस्त्यावर अस्ताव्यस्त  पसरलेल्या माझ्या काळजाच्या तुकड्याना गोळा करून
मग मी सगळा धीर एकवटणार
तुझ्या वाटेवर डोळे लावून मनातल्या मनात वाक्यांची जुळवाजुळव करणं
हे आता रोजचंच झालंय


तू ही नेहमीचीच ...अगदी साधी, नक्षत्रासारखी
माझ्या समोरून तू येणार , आणि तशीच निघून जाणार
माझा जीव अर्धं मेला होऊन ते फक्त बघत बसणार ...
एक दिवस मात्र ठरवूनच आलो
जीव गेला तरी बेहत्तर पण आज बोलल्याशिवाय घरीच जायचं नाही
तोच आडोसा , तीच हूरहुर
काळजाच्या ठोक्यांची तीच चुकामूक 
सगळं अगदी नेहमीसारखं 
तू फक्त त्या दिवशी आली नाहीस
त्या दिवशी नाही आणि परत कधीच नाही
त्यानंतरचा प्रत्येक दिवस मी तिथे येतोय
तुझ्या भासांच्या सहवासात तिथेच घुटमळतोय

आपल्या नेहमीच्या आडोश्या पाशी 
कधी कधी पाठमोरी दिसतेस् मला तू
पण हल्ली  ठोक्यांचं चुकण बंद झालाय

परवा तो आडोसा मला म्हणत होता
"बाबा रे ...ती गेली निघून कायमची 
तू अजुन किती दिवस वाट बघणार ?
मी हसून म्हणालो ,
"असुदे रे मित्रा ... हे आता रोजचंच झालंय

दु:ख तू तिथे नसण्याचं नाही
दु:ख मी तिथे असण्याचं आहे 
तुझ्याकडे येणारे सगळे रस्ते , तो भकास रिकामा आडोसा आणि मी
आम्हीच राहिलो आहोत आता एकमेकांना 

शेवटी  मग पुन्हा ...परतीचा प्रवास ,
जड पावलांचा ....घरापर्यंत 
आणि ....जाताना एक नि:शब्द, बेफिकीर सिगर्रेट 
हे आता रोजचंच झालंय...

--भालचंद्र 

Monday, 6 January 2014

नवं - जुनं

            " नावीन्य हवे असणे " हा माणसाच्या स्वभावाचा एक अविभाज्य पैलू आहे. प्रत्येक गोष्टीत नाविण्याची ओढ ही माणसाच्या जिवंतपणाचा पुरावा असते. कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात घडते किंवा एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, तेंव्हा होणारा आनंद, उत्साह हा अमर्याद असतो. आपल्या भाषेत एक म्हण आहे "नव्याचे नऊ दिवस " अर्थात नवीन घटनेचे , गोष्टीचे , व्यक्तीचे कौतुक ती नवीन असेपर्यंतच असते, नंतर मात्र तिच्याकडे नजर देखील वळेनसि होते.
       विद्यार्थी दशेत असताना दरवर्षी पुढील इयत्तेत गेल्यानंतर, नवीन पुस्तके, नवीन वह्या, नवीन छत्री, नवे शिक्षक, नवे विषय आणि आयुष्यातील एक नवे पाऊल  या गोष्टी  भरपूर अभ्यास करण्याचा संकल्प करण्यासाठी पुरेशा असतात. आपण सुद्धा खूप मनापासून ठरवतो की यावर्षी पहिल्यापासूनच भरपूर अभ्यास करायचा, रोजच्या रोज गृहपाठ करायचा आणि शाळेत पहिला नंबर पटकवायचा. तो निर्धार अतिशय निर्मळ, शुद्ध आणि स्वच्छ मनाने केलेला निर्धार असतो, त्याच्यात कुठेही खोटेपणा नसतो, वाईट हेतू नसतो , अतिशय प्रामाणिकपणे घेतलेला आपला तो निर्णय असतो.  घेतलेल्या निर्णायानुसार अपा वागायला सुरूवात देखील करतो, पहिल्या दिवसापासूनच अतिशय सभ्य , हुशार ,शांत आणि सुस्वभावी होण्याचा मनापासून प्रयत्न आपण करतो  आणि तो यशस्वी देखील होतो. पण जसे जसे दिवस पुढे सरकत जातात, इयत्ता जुनी होत जाते, वह्या, पुस्तके, शिक्षक, विषय सवयीचे होत जातात, तसे तसे आपल्यातले धांदरट, खोडकर, दंगेखोर मूल बाहेर येऊ लागते , वह्यांच्या प्रारंभी च्या पानांवराती असलेले हस्ताक्षर आणि शेवटच्या पानांवराती असलेले हस्ताक्षर यांच्यात कमालीची तफावत दिसू लागते, हे हस्तलिखित एकाच माणसाचे आहे असे देखील छाती ठोक पणे कोणी सांगू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. बघता बघता वर्ष संपून जातं, परीक्षा येतात आणि निघून जातात, मग निकालाचा दिवस उजडतो , त्या दिवशी आपला खरोखर निकाल लागतो आणि मग मन निराश होतं, हताश होतं , स्वत:वरच चिडत, आणि वर्षभर केलेल्या चुकांचा पाढा एका क्षणात आपल्याला आठवतो.
 मग असेच निराशवस्थेत काही दिवस निघून जातात , थोडं दु:ख हलकं होतं , आणि मग खचलेलं मन पुन्हा एकदा उचल खातं, कारण पुन्हा एकदा हातात आलेली असतात नवीन पुस्तकं, नवीन वह्या, नवीन विषय आणि नवीन शिक्षक , पुन्हा एकदा नव्याने आलेला असतो नवीन पावसाळा , मातीचा ओला सुगंध देखील गेल्यावर्षीपेक्षा अधिकच चांगला येतोय असं वाटू लागतं, नव्याने हिरव्यागार झालेल्या झाडांच्या पानफुलांमधे सगळी निराशा कुठल्या कुठे गायब होऊन जाते तेच काळात नाही . येणार्‍या दिवसांच्या उंबरठ्यावर नव्या ध्येयाची नवी स्वप्ने आपोआप पडू लागतात , रोजचेच सूर्यकिरण नवे भासु लागतात आणि हे येणारं वर्ष ...या वर्षी आपण नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा चांगलं करून दाखवू अशी खात्री आपली आपल्यालाच पटते. एकदा का ही खात्री पटली की मग पुढचं सगळं सोप्पं होऊन जातं.  या वर्षी देखील शाळेत आपला पहिला नंबर येत नाही , धांदरटपणा , खट्याळपणा, दंगेखोरपणा पूर्णपणे बंद होत नाही, या वर्षी ही निकालच्या दिवशी आपला निकालच लागलेला असतो , पण मागच्या वर्षीपेक्षा तो नक्कीच चांगला असतो .
      हीच तर माणसाच्या मेंदूची कमाल आहे , आपण शाळेमध्ये इतर विषय तर शिकतोच पण त्याहीपेक्षा आपण शाळेत आयुष्य जगणं शिकतो , चुकांमधून शिकणे यालाच आयुष्य म्हणतात . जुन्या चुका नव्याने करता नवीन चुका करून पुढच्या वेळी त्या चुका सुधारणे हे ज्याचे ध्येय असते तो खरं आयुष्य जगत असतो , कधी ही चुकणारा माणूस हा मृत अवस्थेप्रमाणेच असतो.
                 म्हणूनच नव्या गोष्टींचे स्वागत कोणी कसे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो , आपण सगळेच आरंभशूर असतो. नवीन गोष्ट आपण सगळेच आनंदाने , काळजीपूर्वक आणि उत्साहाने करत असतो , ती जुनी झाल्यानंतर आपण कसे वागतो यावर आपले यशापयश अवलंबुन असते. म्हणून नावीण्यावर भुराळून जाता स्वत:च्या कर्त्वव्यवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक दिवस नव्याने जगावा ,
संदीप खरे च्या कवितेतील चार ओळी मला खूप आवडतात :
             स्वत:ला विकून काय घेशिल विकत?
             खरी खरी सुखे राजा मिळती फुकट!
             हपापून बाजारात मागशील किती?
             स्वत:तच नवे काही शोधायला हवे!.... कधीतरी वेड्यागात वागायला हवे
                       कधीतरी वेड्यागात वागायला हवे
असेच स्वत: तच नवे काहीतरी शोधण्याचा या नवीन  वर्षी माझा संकल्प आहे...
          हे नवीन वर्ष तुम्हा सर्वाना आनंदाचे सुखा समाधानाचे आणि भरभराटीचे जाओ हीच प्रार्थना... नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

                                              ---भालचंद्र